Maharshtra Weather Update : महाराष्ट्रावर सायक्लोनिक सर्क्युलेशनचा (cyclonic circulation) प्रभाव, ठाणे-मुंबईत यलो अलर्ट तर कोकणपट्ट्यात उष्णतेची लाट, विदर्भात मुसळधार पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, सायक्लोनिक सर्क्युलेशनचा (cyclonic circulation) मोठा प्रभाव महाराष्ट्रावर पाहायला मिळत आहे. दक्षिणेकडून पुढे सरकणारे वारे, गुजरातच्या बंदरावरुन येणाऱ्या वारे आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली चक्रीवादळासारखी स्थिती या सगळ्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होताना दिसत आहे.
राज्यात कुठे अति थंड हवामान, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे उष्णतेची लाट असे संमिश्र हवामान गेल्या दोन दिवसापासून पाहायला मिळत आहे.
आज २२ मार्च रोजी ठाणे आणि मुंबईत हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर २३ मार्च रोजी मुंबईसह उपनगर, ठाणे, उपनगर, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
२३ आणि २४ मार्च रोजी मुंबईसह कोकण पट्ट्यात तीव्र उन्हाच्या झळा बसणार आहेत. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी, उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने कळविले आहे.
तर दुसरीकडे विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर यवतमाळ आणि चंद्रपुरात गारपिटीचा इशारा देण्यात आला असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यात कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे. पुणे, सातारा आणि सांगली मध्ये पारा ४० च्या खाली आला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातसुद्धा काहीसा दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* येत्या दोन दिवसात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता लक्षात घेता, काढणी व मळणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
* कापूस पिकाच्या पऱ्हाट्या काढून त्याची योग्य विल्हेवाट लावावी जेणेकरून गुलाबी बोंड अळीच्या जीवनक्रमात घट पडेल, असा सल्ला देण्यात आला आहे.