Maharashtra Weather Update Today : मागील काही दिवसांपासून राज्यात उष्णता वाढताना दिसत आहे. विशेषत: कोकण विभागात तापमानाचा पारा वाढत आहे. येत्या दोन दिवसात या भागात उष्ण वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट पसरली आहे, तिथे राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरीमध्ये उष्ण आणि दमट वातावरण असण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात काल शुक्रवारी कोरड्या तापमानाची नोंद करण्यात आली होती. आज शनिवारीही पालघरमध्ये कोरडे हवामान असेल.
'या' जिल्ह्यांत कसे असेल हवामान
पालघर, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट परिसर, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर धाराशिव, अकोला, अमरावती आणि भंडारा जिल्ह्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात किमान तापमान १० ते १२ अंश सेल्सियसने घसरल्याची नोंद गुरुवारी (७ मार्च) रोजी करण्यात आली. दरम्यान, गुरुवारी मुंबईत कुलाबा परिसरात २२.५, सांताक्रूझमध्ये १८.६ अंश सेल्सियसची किमान तापमानाची नोंद झाली.
शेतकऱ्यांना सल्ला
* काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. उन्हाळी हंगामासाठी लागवड केलेल्या भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
* कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामुळे, उन्हाळी भाजीपाला पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.