प्रशांत मुळी
मराठवाड्यातील पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा येलदरी जलाशय सध्या पुरेशा साठ्याने भरलेला असला तरी आगामी काळात 'अल निनो'च्या संभाव्य परिणामामुळे चिंता वाढली आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील हंगामात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवली असून, प्रशासनासमोर पाणी नियोजनाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
'अल निनो'चा प्रभाव; पावसात घट होण्याची शक्यता
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, 'अल निनो' सक्रिय राहिल्यास देशातील अनेक भागांप्रमाणेच महाराष्ट्रातही पावसाचे प्रमाण कमी राहू शकते. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्याची गरज अधोरेखित होत आहे.
सध्या ६५ टक्के जिवंत साठा; तरीही धोका कायम
येलदरी धरणात सध्या सुमारे ६५ टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी धरण १०० टक्के भरले होते, त्यामुळे सध्याचा साठा समाधानकारक वाटतो.
मात्र, पुढील वर्षी पाऊस कमी पडण्याची शक्यता लक्षात घेता हा साठा दीड वर्षाच्या गरजा लक्षात घेऊन वापरण्याची आवश्यकता आहे.
भविष्यात पाणीटंचाईचा धोका
येलदरी धरणातून परभणी, हिंगोली तसेच मराठवाड्यातील अनेक शहरांना पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामातील शेतीसाठीही हेच पाणी वापरले जाते.
जर सध्या पाण्याचा वापर नियंत्रित केला नाही, तर येत्या काळात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
नियोजनाचा अभाव ठरू शकतो धोकादायक
उन्हाळ्यात वाढणारे बाष्पीभवन आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता, जलसंपदा विभागाने आतापासूनच कठोर नियोजन करणे गरजेचे आहे.
तज्ज्ञांच्या मते, धरणातील किमान ५० टक्के पाणीसाठा पुढील वर्षासाठी राखीव ठेवण्याची गरज आहे.
शेतकऱ्यांसाठी सूचना
सध्या पिण्याचे पाणी वगळता राखीव साठ्याबाबत कोणतेही आदेश नाहीत.
मात्र, पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यावर भर देण्यात येत आहे.
नागरिकांनीही घ्यावी जबाबदारी
'अल निनो'मुळे पाऊस कमी पडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने वेळेत उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नागरिकांनीही पाणी जपून वापरणे आवश्यक आहे.
सध्या येलदरी धरणात पुरेसा पाणीसाठा असला तरी 'अल निनो'च्या पार्श्वभूमीवर भविष्यातील संकट टाळण्यासाठी आजच नियोजन करणे अत्यावश्यक आहे.
प्रशासन, शेतकरी आणि नागरिक यांनी एकत्रितपणे पाणी बचतीकडे लक्ष दिल्यास संभाव्य पाणीटंचाई टाळता येऊ शकते.
धरणात आज रोजी ६५ टक्के जिवंत पाणीसाठा आहे. पिण्याचे पाणी वगळता राखीव पाणीसाठा ठेवण्याबाबत आदेश नाहीत. परंतु, पाण्याचा काटकसरीने वापर करून बचत करण्याबाबत सूचना आहेत. राज्यात सुरु असलेल्या जल व्यवस्थापन कृती पंधरवडा यात शेतकऱ्यांना पाणी काटकसरीने वापर करण्याबाबत तसेच शेत जमिनीला ठिबक, तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा.- आर.पी. गरुड, कार्यकारी अभियंता, पूर्णा पाटबंधारे विभाग.
येणाऱ्या पावसाळ्यात 'अल निनो'च्या प्रभावामुळे पाऊस कमी पडणार असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. त्यामुळे असे असेल तर जलसंपदा विभागाने उपाययोजना करणे आवश्यक आहे. नागरिकांनीही पाणी जपून वापरणे गरजेचे आहे.- रमोद चव्हाण, जिंतूर कृउबा. समिती संचालक, सावंगी म्हाळसा
अधिक वाचा :Natural Farming : शेतीत मोठा बदल; नागपुरात 'नैसर्गिक शेती'ची पायाभरणी वेगात
