Yeldari Dam : हिंगोली आणि सेनगाव तालुक्यात पाणी मिळावे ही मागणी वर्षानुवर्षे होत असूनही प्रत्यक्षात ती कागदावरच राहिली आहे. जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी आता धोरणात्मक निर्णयाची गरज आहे.(Yeldari Dam)
हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या आशा येलदरी प्रकल्पाच्या गाळात अडकल्या आहेत. धरण असूनही पाण्याचा अपुरा साठा, वाढत चाललेला गाळ आणि मागील दशकभरात अवघ्या तीन वेळाच धरण भरल्याने शेतकऱ्यांना डावा कालवा व उपसा जलसिंचन योजनेसारख्या प्रस्तावांना अजूनही वाट पाहावी लागत आहे.(Yeldari Dam)
जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी येलदरी प्रकल्पावरून डावा कालवा किंवा उपसा जलसिंचन योजना राबविण्याची मागणी होत आहे; मात्र प्रत्यक्षात येलदरी प्रकल्पात मागच्या काही वर्षांपासून पुरेसा पाणीसाठा होत नाही.(Yeldari Dam)
उपलब्ध पाण्यावर अनेक योजना कार्यान्वित असल्याचे कारण दिले जात असल्याने या योजनांच्या मंजुरीला अजूनही हिरवा कंदील मिळालेला नाही.(Yeldari Dam)
येलदरी, सिद्धेश्वर आणि उर्ध्व पैनगंगा ही तीन मोठी धरणे जिल्ह्यात आहेत. जिल्ह्याचा अनुशेष वाढत चालला आहे. धरण जवळ असतानाही सेनगाव तालुक्यात या धरणातून थोडेही सिंचन होत नाही.(Yeldari Dam)
येलदरी धरणाच्या(Yeldari Dam) पाणीसाठ्यावरच सिद्धेश्वर धरणाची भिस्त आहे. येलदरीचे पाणी जिल्ह्यातील शेतीला मिळावे, अशी जिल्हावासीयांची रास्त अपेक्षा आहे.
हिंगोली आणि सेनगाव या दोन तालुक्यातील सिंचन वाढविण्यासाठी येलदरी प्रकल्पातून डावा कालवा काढण्याची मागणी होत आहे. तसेच माजी खासदार हेमंत पाटील यांनीही या प्रकल्पावर तीन उपसा जलसिंचन योजना मंजूर करण्याची मागणी २०२२ मध्येच केली आहे.
मात्र, या प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा होत नाही. दहा वर्षांत केवळ तीन वेळा हे धरण १०० टक्के भरले आहे. येलदरी धरणाच्या उर्ध्व बाजूस खडकपूर्णा प्रकल्प व इतर जलसंधारणाची कामे झाल्याने धरणात पाण्याचा येता कमी झाला आहे. लाभक्षेत्राव्यतिरिक्त जलाशय व कालवा उपसाद्वारे सिंचनाचे प्रमाण वाढले आहे.
थेट जलदगती कालव्याद्वारे औंढा भागास आणि सिद्धेश्वर धरणातून उपसा सिंचन करून पुन्हा कालवा प्रवाहाने सिंचन करणे या दोन्ही बाबी पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने प्रस्ताव २०२२ मध्येच नामंजूर करण्यात आले. या धरणाच्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर हिंगोलीसाठी व्हावा, यासाठी प्रयत्नांची गरज आहे.
९३४ दलघमीच्या धरणात १३४ दलघमी गाळ
९३४ दलघमी पाणी साठवण क्षमता असलेल्या येलदरी धरणात सध्या १३४ दलघमी गाळ साचलेला आहे. नाशिकच्या महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने २०१२ मध्ये सर्वेक्षण केले होते. त्यानुसार या धरणात १३४ दलघमी गाळ असल्याचे कळविले. त्यामुळे धरणाची पाणीसाठवण क्षमताही कमी झाली आहे. धरणातील वाढलेला गाळ देखील नवीन योजनेसाठी अडथळा ठरत आहे.
हेमंत पाटील यांनी केली होती मागणी
जिल्ह्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी येलदरी प्रकल्पावरून उपसा जलसिंचन योजना मंजूर करणे आवश्यक आहे, अशी मागणी तत्कालीन खासदार हेमंत पाटील यांनी २०२१ मध्ये तत्कालिन जलसंपदा मंत्र्यांकडे केली होती; मात्र त्यावेळी जलसंपदा विभागाच्या बैठकीत या दोन्ही योजना नामंजूर करण्यात आल्या. त्यासाठी २००५ मध्ये जलसंपदा मंत्र्यांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाचा संदर्भदिला होता. त्यामुळे आता नव्याने या योजनेसाठी पाठपुरावा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
२४ हजार हेक्टरवर सिंचन
येलदरी धरणाच्या पाण्यावरुन मागील वर्षी २३ हजार ९५१ हेक्टर शेतजमिनीचे सिंचन झाले आहे. रब्बी हंगामात १३ हजार २७९ हेक्टर आणि उन्हाळी हंगामासाठी १० हजार ६७२ हेक्टर सिंचन झाले. या दोन्ही सिंचनासाठी २४३.८४५ दलघमी पाणी वापरण्यात आले.
पिण्याच्या पाण्यासाठी ७६ दलघमी आरक्षित
येलदरी प्रकल्पावरुन विविध पाणीपुरवठा योजना राबविल्या जातात. तसेच औद्योगिक वापरासाठीही येलदरीतील पाण्याचा वापर होतो. त्यामुळे घरगुती पाण्यासह औद्योगिक कारणासाठी असे एकूण ७६.७२८ दलघमी पाणी दरवर्षी लागते.