विजयकुमार गाडेकर
गतवर्षी परतीच्या पावसात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फायदा यंदा उन्हाळ्यात दिसून येत असून, सिंदफणा मध्यम प्रकल्पात अजूनही २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता कमी झाली असून, उन्हाळी हंगामातही सुमारे २०० एकर क्षेत्र ओलिताखाली राहिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.(Sindphana Dam)
तालुक्यातील सिंदफणा मध्यम प्रकल्पाची उभारणी सन १९६५ मध्ये करण्यात आली होती. मात्र कालांतराने प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ साचत गेल्याने त्याची पाणी साठवण क्षमता कमी होत गेली.(Sindphana Dam)
अनेक वर्षे प्रकल्पाच्या उंचीवाढीचे काम रखडले होते. नंतर प्रकल्पाच्या भिंतीची उंची वाढवण्यात आली, मात्र सांडव्यामध्ये आवश्यक बदल न झाल्याने जोरदार पावसात मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्याची समस्या कायम आहे.(Sindphana Dam)
गतवर्षी परतीच्या पावसात झालेल्या मुसळधार पावसामुळे सिंदफणा नदीला महापूर आला होता. नदीकाठावरील परिसर जलमय झाला होता. त्याचबरोबर विहिरी, बोअरवेल आणि लहान-मोठे तलावही तुडुंब भरले होते. या पावसामुळे सिंदफणा आणि उथळा मध्यम प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण झाला.
याच साठलेल्या पाण्याचा फायदा यंदा उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांना झाला. सिंदफणा मध्यम प्रकल्पाच्या पाण्यावर सुमारे २०० एकर जमीन ओलिताखाली आली असून, अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी पिके घेतली. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीतही शेती हिरवीगार राहिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
प्रकल्पात किती पाणीसाठा?
सिंदफणा मध्यम प्रकल्पाची सध्याची पाणीपातळी ५७६.१५ ते ५७८.९६ मीटर दरम्यान असून, एकूण पाणीसाठा १.६२३ दशलक्ष घनमीटर इतका आहे. त्यापैकी जिवंत पाणीसाठा १.६२१ दशलक्ष घनमीटर असून तो एकूण क्षमतेच्या २२ टक्के आहे.
सध्या हा पाणीसाठा राखून ठेवण्यात आला असून, त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नसल्याची माहिती प्रकल्पाचे शाखा अभियंता विजय पाखरे यांनी दिली.
स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांच्या मते, योग्य नियोजन आणि पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास सिंदफणा प्रकल्प भविष्यातही तालुक्याच्या शेती आणि पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा आधार ठरू शकतो.
हे ही वाचा सविस्तर : Marathwada Water Crisis : मराठवाडा अजूनही तहानलेला; नदीजोड प्रकल्पाशिवाय पर्याय नाही
अधिक वाचा : Monsoon Arrival Date : मान्सूनने घेतली वेगवान धाव; महाराष्ट्रात 'या' दिवसापासून बदलणार हवामान
