Monsoon Arrival Date : उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नैऋत्य मान्सूनने अंदमान-निकोबार बेटांमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला असून, यंदाच्या पावसाळ्याची सुरुवात झाली आहे.(Monsoon Arrival Date)
IMD ने शनिवारी याबाबत माहिती देताना मान्सून अरबी समुद्राच्या आग्नेय भागात, बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य व आग्नेय भागात तसेच अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांमध्ये सक्रिय झाल्याचे स्पष्ट केले.(Monsoon Arrival Date)
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवसांत मान्सून आणखी वेगाने पुढे सरकणार असून, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील आणखी काही भाग व्यापण्याची शक्यता आहे.
तसेच अंदमान बेटांचा उर्वरित भाग आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरातही मान्सून दाखल होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सून २६ ते ३१ मेदरम्यान केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर साधारणपणे एका आठवड्यात तो महाराष्ट्राच्या दिशेने आगेकूच करतो.
त्यामुळे ६ जूनच्या आसपास कोकण किनारपट्टीवर मान्सूनची पहिली हजेरी लागण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर काही दिवसांत उर्वरित महाराष्ट्रात पावसाचे आगमन होऊ शकते.
सध्या राज्यात विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असली, तरी वातावरणातील बदल आणि समुद्रातील अनुकूल स्थितीमुळे यंदा मान्सून वेळेआधी किंवा वेळेवर दाखल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
विदर्भात उष्णतेचा कहर; अमरावती-वर्ध्यात पारा ४६ अंशांवर
विदर्भात उष्णतेने अक्षरशः कहर माजवला आहे. शनिवारी अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान तब्बल ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले.
यामुळे दोन्ही जिल्हे राज्यातील सर्वाधिक उष्ण ठिकाणांमध्ये गणले गेले. दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडल्याचे चित्र अनेक शहरांमध्ये दिसून आले.
अकोल्यात ४५.४ अंश सेल्सिअस, यवतमाळ आणि ब्रह्मपुरी येथे ४५.२ अंश तापमानाची नोंद झाली. नागपुरातही तापमान ४३.८ अंश सेल्सिअसवर पोहोचले असून ते सरासरीपेक्षा अधिक होते.
चंद्रपूरमध्ये ४३.६, वाशिममध्ये ४३.२, गडचिरोलीत ४२.६, गोंदियात ४२.२ तर भंडारा आणि बुलढाण्यातही तापमान ४२ अंशांच्या आसपास नोंदवले गेले.
उष्ण वाऱ्यांचा तडाखा, नागरिक त्रस्त
दिवसभर वाहणारे उष्ण वारे आणि कोरडे वातावरण यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
सकाळी वातावरणात काही प्रमाणात आर्द्रता असली तरी दुपारपर्यंत हवा पूर्णपणे कोरडी होत असल्याने उकाडा आणि उमस दोन्ही वाढत आहेत. परिणामी, घराबाहेर पडणाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
रात्रीच्या तापमानात किंचित घट झाली असली तरी उष्णतेची तीव्रता कायम आहे. नागपूरचे किमान तापमान २७.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
विशेष म्हणजे शनिवारी विदर्भातील कोणत्याही जिल्ह्यात पावसाची अधिकृत नोंद झाली नाही.
पुढील काही दिवस 'हीटवेव्ह' कायम
हवामान विभागाने पुढील काही दिवस विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, हलके कपडे वापरावेत आणि उष्माघातापासून स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
उष्णतेने हैराण झालेल्या महाराष्ट्रासाठी आता मान्सूनच्या आगमनाचीच प्रतीक्षा लागली असून, अंदमानमधील एन्ट्रीमुळे पावसाच्या आशा आणखी बळावल्या आहेत.
अधिक वाचा : Vidarbha Heatwave Alert : दिवसच नाही तर रात्रीही तापल्या; विदर्भात 'हॉट नाईट'चा धोका
