Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटींग केल्यावर आता वरुणराजा थोडासा विश्रांती घेताना दिसतोय. राज्यातील बहुतांश भागात हवामान बदलून उन्हाची चाहूल लागली आहे.(Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांमध्ये पावसाचा जोर राज्यभरात कमी होताना दिसणार आहे. सततच्या पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसह नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे.(Maharashtra Weather Update)
पावसाची तीव्रता कमी होणार
मध्य भारतात सक्रिय असणाऱ्या कमी दाबाच्या प्रणालीचा प्रवास पाकिस्तानच्या दिशेने सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात आकाश ढगाळ असले तरी मुसळधार पावसाला ब्रेक लागला आहे. मागील २४ तासांत अनेक भागात पावसाने पाठ फिरवल्याचे दिसले.
दक्षिण भारतात प्रणाली सक्रिय
सध्या बंगालच्या उपसागरापासून आंध्र किनारपट्टीपर्यंत चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्याचबरोबर कर्नाटक ते तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये पावसाची परिस्थिती राहणार आहे. मात्र, महाराष्ट्रावर या प्रणालीचा मोठा परिणाम होणार नाही.
मुंबई आणि कोकणात उन्हाची चाहूल
राज्याच्या किनारपट्टी भागात आकाश निरभ्र होऊन सूर्यप्रकाश दिसेल. मुंबई, उपनगर आणि ठाण्यासह कोकणातील अनेक भागात स्वच्छ हवामानाचा अनुभव येईल. पावसाचा अडथळा कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
मराठवाड्यात तुरळक पाऊस
मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकामांचे नियोजन करणे गरजेचे आहे.
मान्सूनच्या माघारीवर प्रश्नचिन्ह
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ दरम्यान ला निना (La-Nina) प्रणाली सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
त्याचबरोबर हिंदी महासागरातील द्विध्रुवीय IOD नकारात्मक होण्याचा अंदाज आहे. या परिस्थितीचा मान्सूनच्या माघारीवर परिणाम होईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ला निना म्हणजे काय?
ला निना ही पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान कमी होण्याची स्थिती आहे, ज्यामुळे हवामानात बदल होतात, विशेषत: पावसावर त्याचा परिणाम होतो.
राज्यात पावसाचा जोर ओसरला असून, हवामानात सुधारणा दिसत आहे. मुंबई व कोकणात सूर्यप्रकाश तर मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता कायम आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* पावसाचा जोर कमी होत असल्याने तुरी, सोयाबीन, उडीद यांसारख्या पिकांना लागणारी वाढीची खते (युरिया, डीएपी) टप्प्याटप्प्याने द्यावीत.
* वेळोवेळी शेतात फेरफटका मारून पिकांची तपासणी करावी व तज्ज्ञांच्या सल्ल्याने कीडनाशकांची फवारणी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.