Maharashtra Weather Update : नव्या वर्षाची सुरुवात उत्साहात झाली असली तरी, १ जानेवारीपासूनच हवामानाने मात्र सर्वसामान्यांना आणि शेतकऱ्यांना चिंतेत टाकणारे संकेत दिले आहेत. (Maharashtra Weather Update)
देशभरात एकाच वेळी पाऊस, कडाक्याची थंडी, धुके आणि काही भागांमध्ये उन्हाचा तडाखा अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नेमका कोणता ऋतू सुरू आहे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.(Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, मागील ४८ तासांपासून सक्रिय असलेल्या पश्चिमी झंझावातामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाने जोर धरला आहे. (Maharashtra Weather Update)
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लेह-लडाख या पर्वतीय भागांमध्ये पावसासह बर्फवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला असून, पुढील २४ तासांत ही स्थिती कायम राहणार आहे. यासोबतच तीव्र थंडीची लाट हाडं गोठवणारी ठरणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
उत्तर भारतात पाऊस, धुके आणि गारठ्याचा दुहेरी फटका
दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.
राजस्थान आणि मध्य भारतातील काही भागांमध्येही पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
उत्तर भारतात सकाळच्या वेळी दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असून, वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
दक्षिण भारतात वादळी पावसाचा इशारा
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ५० तासांत दक्षिण भारतात मोठे हवामान बदल होण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीप या भागांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच पूर्वोत्तर भारतातील काही राज्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
महाराष्ट्रात पाऊस, थंडी आणि ऊन-तीनही ऋतू एकत्र
देशभरातील हवामान बदलांचा परिणाम महाराष्ट्रावरही स्पष्टपणे जाणवत आहे. राज्यात एकाच वेळी पाऊस, थंडी आणि ऊन अशी मिश्र स्थिती पाहायला मिळत आहे.
कोकण आणि मुंबई किनारपट्टी भागांमध्ये पुढील १२ ते २४ तास पावसाची शक्यता असून वातावरण ढगाळ राहणार आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील १२ तास पावसाचा इशारा देण्यात आला असून, त्यानंतर शीतलहरींचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका अधिक वाढण्याचा अंदाज आहे.
उत्तर भारतातील थंडीची लाट अधिक तीव्र झाल्यास महाराष्ट्रातही गारठा कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मात्र, पुढील २४ तासांनंतर काही भागांमध्ये तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
१ जानेवारी : आजचा दिवस पावसाचा
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देशाच्या चारही दिशांना हवामान अस्थिर आहे. पर्वतीय भागांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी, उत्तर भारतात थंडी आणि धुके, दक्षिण भारतात वादळी पाऊस, तर महाराष्ट्रात पाऊस आणि गारठा अशी स्थिती पुढील ४८ तास राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि थंडीपासून संरक्षणाची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हवामान यंत्रणा सतत या बदलांवर लक्ष ठेवून असून, वेळोवेळी अद्ययावत माहिती देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* गारठा व थंडीचा परिणाम भाजीपाला, हरभरा, गहू व रब्बी पिकांवर होऊ शकतो. शक्य असल्यास संध्याकाळच्या वेळी हलके पाणी द्या, त्यामुळे गारठ्याचा धोका कमी होतो.
* धुक्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. फवारणी करताना हवामान कोरडे असतानाच करावी; ढगाळ किंवा पावसाच्या आधी फवारणी टाळावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
