Maharashtra Weather Update : राज्यातील हवामान सध्या अत्यंत लहरी झाले असून एकीकडे कडक उन्हाचा तडाखा तर दुसरीकडे वादळी पावसाची शक्यता अशी दुहेरी परिस्थिती निर्माण झाली आहे.(Maharashtra Weather Update)
गेल्या दोन दिवसांत काही भागांत तापमान झपाट्याने वाढले असताना, पुढील काही दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(Maharashtra Weather Update)
कोकणात उष्णतेची लाट
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उत्तर कोकणात उष्णतेचा प्रचंड तडाखा जाणवत आहे. मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान तब्बल ४० अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले असून अनेक वर्षांतील हा उच्चांक मानला जात आहे.
ठाणे, पालघर आणि डहाणू या किनारपट्टीच्या भागांमध्येही तापमानाने ४० अंशांचा टप्पा गाठला आहे. समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांच्या दिशेत झालेल्या बदलामुळे उकाडा वाढल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. या भागात नागरिकांना दुपारच्या वेळी प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत आहे.
विदर्भातही उन्हाचा चटका
विदर्भातही उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. अकोला येथे ४०.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून ब्रह्मपुरी येथे ४०.४ अंश तापमान नोंदले गेले आहे. त्यामुळे हवामान विभागाने अकोला जिल्ह्यासाठी उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे.
अमरावती, वर्धा, वाशिम आणि धुळे जिल्ह्यांमध्येही तापमान ३९ अंशांच्या आसपास पोहोचल्याने दुपारच्या वेळी बाहेर पडणे नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे.
प्रतिचक्रवातामुळे तापमानात वाढ
गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागांवर प्रतिचक्रवातीय (Anticyclone) स्थिती निर्माण झाल्यामुळे हवामानात मोठा बदल झाला आहे.
या प्रणालीमुळे ढगांची निर्मिती कमी होत असून सूर्यकिरण थेट जमिनीवर पोहोचतात. परिणामी दिवसाचे तापमान झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
उष्णतेसोबतच राज्यात पावसासाठी पोषक वातावरणही तयार झाले आहे. बिहारपासून छत्तीसगडपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे वातावरणात आर्द्रता वाढत आहे.
त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात शुक्रवारी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर शनिवार आणि रविवारी कोकण वगळता राज्यातील अनेक भागांत वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
देशात तापमानातील टोकाची तफावत
देशपातळीवर पाहिल्यास गुजरातमधील राजकोट येथे ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले असून ते सर्वाधिक उष्ण ठरले आहे.
तर राजस्थानातील पाली येथे किमान ९.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे १३ अंश सेल्सिअस नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.
पुढील दोन दिवसांत दिलासा
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांत कोकणातील तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो.
मात्र दुसरीकडे राज्यातील अंतर्गत भागांत वादळी पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
