Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात सध्या मोठी अस्थिरता पाहायला मिळत असून, राज्याच्या विविध भागांत वेगवेगळे हवामान अनुभवायला मिळत आहे.(Maharashtra Weather Update)
एका बाजूला उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात अवकाळी पावसासह गारपिटीने जोरदार हजेरी लावली आहे, तर दुसरीकडे मुंबई–पुण्यासह अनेक भागांत किमान तापमानात घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे.(Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज २९ जानेवारी रोजी राज्यात ढगाळ हवामानासह तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.(Maharashtra Weather Update)
उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा तडाखा
गेल्या २४ तासांत राज्याच्या काही भागांत निसर्गाचा कोप पाहायला मिळाला. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर परिसरात तसेच नाशिक जिल्ह्यातील येवला भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर परिसरात तब्बल १० ते १२ मिनिटे जोरदार गारपीट झाली. यामुळे सावेर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
काढणीस आलेली पिके, भाजीपाला आणि फळबागांना गारपिटीचा फटका बसल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई–पुण्यात थंडीचा प्रभाव, पहाटे धुकं
राज्याच्या पश्चिम भागात थंडीचा प्रभाव अधिक जाणवत आहे. मुंबईत आज आकाश प्रामुख्याने निरभ्र राहणार असले तरी रात्री आणि पहाटे गारवा वाढणार आहे.
मुंबईचे कमाल तापमान सुमारे ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे पुणे शहर आणि परिसरात आज पहाटे दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. त्यामुळे सकाळच्या वेळेत वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. पुणेकरांना आजही कडाक्याच्या थंडीचा अनुभव घ्यावा लागणार आहे.
राज्यात तापमानाची टोकाची नोंद
बुधवारी राज्यातील निफाड येथे १० अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान नोंदविण्यात आले. तर विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
पंजाबमधील अमृतसर येथे किमान ३.७ अंश सेल्सिअस, तर केरळमधील कोट्टायम येथे कमाल ३६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे.
पुढील २४ तास महत्त्वाचे
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत राज्याच्या काही भागांत किमान तापमानात २ ते ३ अंशांनी घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतरच्या तीन दिवसांत तापमानात हळूहळू वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असल्याने शेतीकामांना वेग येण्याची शक्यता आहे. मात्र, पहाटेच्या धुक्यामुळे वाहनधारकांनी विशेष सावधगिरी बाळगावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* गारपीट व अवकाळी पावसाचा धोका असलेल्या भागातील काढणीस आलेली पिके (हरभरा, गहू, कांदा, भाजीपाला) शक्य असल्यास तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावीत.
* उघड्यावर साठवलेला शेतमाल झाकून ठेवावा किंवा गोदामात साठवण करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
