Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. दमट वाऱ्यांमुळे उष्णतेची तीव्रता वाढत असतानाच काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील २४ तास राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.(Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार,पुढील २४ तासांसाठी महत्त्वाचा इशारा जारी केला असून, विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी सरींसह गारपीटीचाही अंदाजवर्तविण्यात आला आहे. मुंबईत तापमान ३५ ते ३७ अंशांदरम्यान स्थिर राहणार असलं तरी दमट वातावरणामुळे उकाडा अधिक त्रासदायक ठरणार आहे.(Maharashtra Weather Update)
मुंबईत दमट उकाडा वाढणार
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दमट वातावरणामुळे उष्मा अधिक जाणवेल. कमाल तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता असून, पुढील २४ तासांत तापमानात फारसा बदल होणार नाही. पावसाची शक्यता कमी असली तरी हवेत आर्द्रता जास्त राहणार असल्याने उकाडा अधिक त्रासदायक ठरेल.
विदर्भ–मराठवाड्यात अवकाळीचा इशारा
विदर्भात सध्या पारा ३७ अंशांपर्यंत पोहोचला आहे. तरीही यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मराठवाड्यातही अवकाळी सरींनी हजेरी लावली आहे. आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज असून, पिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषतः रब्बी हंगामातील पिकांसाठी ही परिस्थिती चिंताजनक ठरू शकते.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा
कोकण पट्ट्यात दमट हवामान राहील, मात्र पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे उष्णतेचा तडाखा अधिक जाणवेल. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली येथे आकाश निरभ्र राहणार असून, दिवसाच्या तापमानात वाढ होईल.
पावसाला पोषक वातावरण कसे तयार झाले?
बंगालचा उपसागर परिसरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. समुद्रसपाटीपासून काही उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. यासोबतच दक्षिणेकडून कर्नाटकमार्गे मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. तसेच केरळ किनारपट्टी भागात वाऱ्यांनी चक्राकार गती घेतल्याने राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.
देशभरातील स्थिती
देशात थंडीचा प्रभाव कमी होत असून, मध्य व उत्तर भारतात तापमान वाढू लागले आहे. पुढील २४ तासांत पर्वतीय भागांत ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. पश्चिमी झंझावात आणि स्थानिक वातावरणीय बदलांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांसाठी सतर्कतेचा इशारा
अवकाळी पाऊस आणि संभाव्य गारपिटीमुळे शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षणात्मक उपाय करणे आवश्यक आहे.
हवामानातील बदल लक्षात घेऊन काढणीस आलेली पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
राज्यात एकीकडे वाढता उकाडा आणि दुसरीकडे अवकाळी सरींचं सावट या दुहेरी स्थितीमुळे पुढील काही दिवस हवामानात अनिश्चितता कायम राहण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा : Yeldari Dam Water Release : शेतकऱ्यांसाठी खुशखबर; येलदरी धरणातून उन्हाळ्यासाठी पाणी सुरू
