Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून दमदार हजेरी लावणारा पाऊस आता ओसरताना दिसत आहे. हवामान विभागाने पुढील ३ दिवसांसाठी राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविला आहे. (Maharashtra Weather Update)
विदर्भ, कोकण, घाटमाथ्यावर तुरळक सरी कोसळणार असून १५ जुलैपर्यंत पावसाचा जोर कमीच राहील. (Maharashtra Weather Update)
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या दमदार पावसानंतर आता हवामान विभागाने (IMD) पावसाबाबत महत्वाचा अंदाज वर्तविला आहे. (Maharashtra Weather Update)
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र निवळल्यानंतर आणि किनारपट्टीला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा विरल्यानंतर राज्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत राज्यात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
कोठे किती पाऊस?
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ४८ तासांत कोकण, गोवा, विदर्भात अनेक ठिकाणी, तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसतील. १२ जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यातही मेघगर्जनेसह मध्यम पावसाची शक्यता आहे. जालना, जळगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. एकूणच राज्यात १५ जुलैपर्यंत पावसाचा जोर कमीच राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पुणे आणि मुंबईचा वेगळा अंदाज
आज शनिवार रोजी मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण असून काही भागात तुरळक पाऊस झाला आहे.पुढील काही तास मुंबईत जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.
पुण्यात मात्र शनिवारी पावसाने ब्रेक घेतला आहे. पुण्यात जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने धरणांमध्ये समाधानकारक पाणी साठा झाला आहे. पुण्याच्या खेड तालुक्यात झालेल्या पावसामुळे आंबेगाव आणि खेड तालुक्याला वरदान असलेला इंदिरा पाझर तलाव १०० टक्के भरला आहे.
नाशिकसाठी दिलासा
नाशिक जिल्ह्यातही जून-जुलैमध्ये दमदार पाऊस झाल्याने अनेक प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. अंबिका नदीच्या उपनद्या भरून वाहू लागल्या आहेत, तर गिरणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पावसामुळे नदीची पातळीही वाढली आहे. यामुळे गिरणा धरणाचा साठा वाढला असून नाशिक जिल्ह्यातील कळवण, मालेगाव, देवळा, सटाणा, नांदगावसह जळगाव जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* हवामानाचा अंदाज लक्षात घेता शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम पावसावर आधारित कामे नियोजनाने करावीत.
* जास्त पावसाची शक्यता नसल्याने पेरणी केलेल्या पिकांवर तातडीने आवश्यक ते मशागत कामे करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.