Maharashtra Weather Update : राज्यात सध्या हवामानात सातत्याने चढ-उतार जाणवत आहेत. पहाटे आणि रात्री गारवा तर दुपारच्या वेळी उकाडा, अशी संमिश्र स्थिती नागरिक अनुभवत आहेत.(Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील हवामानात पुढील २४ तासांत महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता असून काही भागांत पुन्हा एकदा थंडीची लाट जाणवू शकते.(Maharashtra Weather Update)
पुढील २४ तासांत काय बदल?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या किमान तापमानात पुढील २४ तासांत ३ ते ४ अंश सेल्सिअसपर्यंत बदल होण्याची शक्यता आहे. काही भागांत धुक्याची स्थिती राहू शकते, तर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची रिपरिपही जाणवू शकते.
कोकण विभागासह राज्यातील अनेक भागांत हवामान मुख्यतः निरभ्र राहणार आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडी वाढण्याची शक्यता
राज्यात पुन्हा थंडीची लाट सक्रिय होण्याची चिन्हे असून विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीचा प्रभाव वाढण्याचा अंदाज आहे. सकाळी आणि रात्री थंडी अधिक जाणवेल, तर दुपारच्या वेळी काही प्रमाणात उष्णता जाणवण्याची शक्यता आहे.
मुंबईत कसं असेल हवामान?
मुंबईत हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे. सकाळी आणि रात्री हवेत किंचित गारवा जाणवेल, मात्र दुपारच्या वेळी उकाडा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसा उष्णतेमुळे मुंबईकरांना त्रास जाणवू शकतो. आकाश मुख्यतः स्वच्छ राहील.
पुणे शहर आणि पश्चिम महाराष्ट्राचा अंदाज
पुणे शहर आणि परिसरात पहाटे थंडीचा प्रभाव अधिक जाणवेल, मात्र दिवसभर तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत किमान आणि कमाल तापमानात वाढ झाल्याने थंडीचा जोर काहीसा ओसरला आहे. रात्री व पहाटे गारवा असला तरी दुपारनंतर उन्हाचा पारा चांगलाच वाढत असल्याने काही भागांत दमट वातावरण जाणवत आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा
कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात सूर्यदेव प्रसन्न राहणार आहेत. पुढील ४ ते ५ दिवसांत कमाल तापमानात कोणताही मोठा बदल अपेक्षित नाही. तसेच पुढील ७ दिवसांत किमान तापमानातही मोठी वाढ किंवा घट होण्याची शक्यता नसल्याने थंडीचा जोर तुलनेने स्थिर राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
देशातील थंडीची स्थिती
उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट पसरली आहे. हरियाणातील नर्नुल येथे देशातील सर्वात नीचांकी तापमान ३.० अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. महाराष्ट्रात धुळे येथे ८.८ अंश सेल्सिअस हे राज्यातील नीचांकी तापमान नोंदवले गेले, तर परभणी येथे तापमान १० अंश सेल्सिअस होते. आजही राज्यात तापमानात चढ-उतार पाहायला मिळणार आहे.
उत्तर भारतात पाऊस आणि दाट धुके
२२ आणि २३ जानेवारी दरम्यान पंजाब, हरियाणा, चंदीगड, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात हलक्या पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, बिहारसह राजधानी दिल्लीत तीव्र थंडीची लाट असून सकाळच्या वेळी दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील काही दिवसांत थंडीची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
एकूणच, महाराष्ट्रात पुढील २४ तासांत हवामानात बदल जाणवणार असून थंडी, उकाडा आणि काही भागांत धुके अशी मिश्र स्थिती राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* हरभरा, गहू, कांदा, लसूण, भाजीपाला पिकांवर सकाळच्या धुक्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
* पिकांमध्ये फवारणी सकाळी लवकर किंवा उशिरा संध्याकाळी टाळावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
