Maharashtra Weather Update : राज्यात सध्या हवामानाचा दुहेरी फटका पाहायला मिळत आहे. एकीकडे विदर्भात उष्णतेची लाट तीव्र होत असून तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचले आहे. (Maharashtra Weather Update)
तर दुसरीकडे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि काही कोकण भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.(Maharashtra Weather Update)
पुढील २४ तासांत राज्यात उष्णतेसोबतच वादळी पावसाचेही चित्र पाहायला मिळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.(Maharashtra Weather Update)
गेल्या २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरांसह कोकण किनारपट्टीवर दमट हवामानाचा प्रभाव वाढल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसभर कडक उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना रात्रीच्या वेळी मात्र तापमानात काहीशी घट जाणवत आहे.(Maharashtra Weather Update)
दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला असून अनेक ठिकाणी पारा चाळीशीच्या घरात पोहोचला आहे. अमरावती येथे सर्वाधिक सुमारे ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.
वादळी पावसाचा इशारा
राज्यातील काही भागांत मात्र वेगळेच चित्र दिसत आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
बीड, धाराशिव, जालना, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तसेच सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतही वादळी पावसाचा प्रभाव जाणवू शकतो.
हवामान बदलामागचे कारण
मराठवाड्यापासून दक्षिण कर्नाटकापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. या स्थितीमुळे अनेक ठिकाणी अचानक ढग दाटून येणे, विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
विदर्भात उष्णतेची लाट कायम
नागपूर, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. काही भागांत तापमान ४२ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
कोकणात दमट उकाडा
मुंबई, ठाणे आणि कोकण किनारपट्टी भागात दमट हवामान कायम राहणार असून त्यामुळे उकाड्याची तीव्रता अधिक जाणवेल. दिवस मावळल्यानंतर तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतातही हवामान बदल
देशाच्या इतर भागांतही हवामानात बदल होताना दिसत आहेत. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये १५ आणि १६ मार्चदरम्यान पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही उंच भागांमध्ये गारपिटीचाही इशारा देण्यात आला असून या राज्यांना 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
राज्यातील बदलत्या हवामानामुळे पुढील काही दिवस उष्णता आणि अवकाळी पावसाचा संगम पाहायला मिळण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला
वादळी पावसाचा इशारा लक्षात घेता शेतकऱ्यांनी काढणीस आलेली पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. तसेच वीज आणि वादळी वाऱ्याचा धोका लक्षात घेऊन शेतातील कामे करताना आवश्यक ती काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
