Maharashtra Weather Update : देशातील हवामान पुन्हा एकदा अस्थिर झाल्याचं चित्र दिसत असून, उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीने जोरदार पुनरागमन केलं आहे. हिवाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात अनेक राज्यांमध्ये सातत्याने होत असलेल्या हिमवर्षावामुळे तापमानात मोठी घट नोंदवली जात आहे.(Maharashtra Winter Weather News)
या बदलत्या हवामानाचा परिणाम महाराष्ट्रासह देशातील इतर भागांवरही होऊ लागला आहे.(Maharashtra Weather Update)
उत्तर भारतात थंडीचा कडाका, हिमवर्षावाचा जोर
हिवाळा ऋतू सध्या तिसऱ्या टप्प्यात असून, थंडी लवकरच निरोप घेईल अशी अपेक्षा असतानाच प्रत्यक्षात मात्र थंडीचा कडाका अधिक तीव्र होताना दिसत आहे.
हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये जोरदार हिमवर्षाव सुरू असून, पर्वतीय भागांपासून मैदानी भागांपर्यंत गारठा वाढला आहे.
वाऱ्याच्या दिशेत झालेल्या बदलामुळे आणि पश्चिमी झंझावाताच्या प्रभावामुळे तापमानात घसरण झाली असून, केंद्रीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) या राज्यांमध्ये अतिथंडीचा इशारा देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्रातील हवामानावर काय परिणाम?
महाराष्ट्रात सध्या कोणत्याही थंडीच्या लाटेचा अधिकृत इशारा नसला तरी, तापमानातील चढ-उतार मात्र कायम आहेत.
आज (२७ जानेवारी) रोजी मुंबई शहरातील काही भागांमध्ये अचानक रिमझिम पावसाने हजेरी लावली.
हिवाळा, उन्हाळा की पावसाळा नेमका कोणता ऋतू सुरू आहे, असा प्रश्न नागरिकांनाही पडला आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांमध्ये मराठवाडा, कोकण, विदर्भ आणि मुंबई परिसरात हवामानात लक्षणीय बदल पाहायला मिळणार आहेत.
थंडीचा प्रभाव हळूहळू कमी होत असला तरी ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता मात्र वाढली आहे.
एकाएकी पावसाचं कारण काय?
राज्याच्या तसेच देशाच्या किनारपट्टी भागांमध्ये वाऱ्याची दिशा बदलली असून, हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण पट्ट्यात उष्मा अधिक जाणवत असून, याच उष्णतेचं रुपांतर काही भागांमध्ये रिमझिम पावसात होत असल्याचं हवामान तज्ज्ञ सांगतात.
पुढील २४ तासांसाठीच्या अंदाजानुसार, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण येथे आकाश अंशत: ढगाळ राहील.
घाटमाथा परिसरात धुक्याची चादर, हवेत गारठा वाढेल.
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही ढगाळ वातावरण राहणार असून, नाशिक, धुळे, जळगाव परिसरात हलक्या पावसाच्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागराचा प्रभाव
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात सध्या ताशी २५ ते ३० किमी वेगाने आर्द्रतायुक्त वारे वाहत आहेत.
याच वाऱ्यांमुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील वातावरणात बदल झाला असून, पुढील ४८ तासांमध्ये राज्यातील तुरळक भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
देशभरात पुढे काय?
IMD ने देशातील १३ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशात हिमवर्षाव आणि पावसाचा धोका असून, चंबा, कुल्लू, किन्नौर आणि लाहौल-स्पिती या भागांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.
पुढील २४ तासांत एक नवीन पश्चिमी झंझावात सक्रिय होणार असून, त्यामुळे उत्तर भारतात हवामान अधिक अस्थिर राहणार आहे. याचा परिणाम देशातील इतर भागांवरही वाऱ्यांच्या माध्यमातून जाणवण्याची शक्यता आहे.
नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी?
सतत बदलणाऱ्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर,
लहान मुलं आणि वृद्धांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी
थंडी, उष्मा आणि आर्द्रता यामुळे होणाऱ्या आजारांपासून सतर्क राहावं
उत्तर भारतातील पर्वतीय राज्ये किंवा पूर्वोत्तर भारतात पर्यटनासाठी जाणाऱ्यांनी हवामान विभागाचे अंदाज पाहूनच प्रवासाची आखणी करावी
स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सहकार्य करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* काढणीस आलेली पिकं हरभरा, गहू, ज्वारी, भाजीपाला शक्य असल्यास तात्काळ काढून सुरक्षित ठिकाणी साठवावीत.
* काढणी केलेला शेतमाल उघड्यावर ठेवू नये; झाकण, ताडपत्री किंवा शेडखाली साठवणूक करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
