सलग चार वर्षांपासून जायकवाडी धरण १०० टक्के भरत असल्याने गोदाकाठच्या सुमारे ३५ गावांतील हजारो हेक्टर बिगरसंपादित शेतजमीन धोक्यात आली आहे. शासनाने यापूर्वी जमिनी संपादित करून मोबदला दिला असला तरी, आता दरवर्षी धरणाचे पाणी बिगर संपादित शेतीकडे सरकत असल्याने गोदाकाठचे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
यावर्षी तर धरणाच्या पाण्याने पूररेषा ओलांडून आजवर कधीही न आलेल्या शेतात प्रवेश केल्याने शेतकरी पुरते धास्तावले आहेत. ऑक्टोबर महिना संपून नोव्हेंबर उजाडणार असला तरी नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणसमूहातून आणि शिवना नदीतून पाण्याची आवक सुरूच आहे. त्यामुळे जायकवाडीचे बॅकवॉटर तुडुंब भरून आता हळूहळू धरणाच्या फुगवटधाचे पाणी बिगरसंपादित शेतीकडे सरकू लागले आहे.
धरणाचे पाणी दरवर्षी असे पूररेषा ओलांडून बाहेर येते, परंतु यंदा त्यापेक्षा सुमारे वीस फुटापासून ते शंभर फुटापर्यंत जास्त पुढे सरकले आहे. कायगाव, अंमळनेर, लखमापूर, धनगरपट्टी, अगरवाडगाव, भिवधानोरा आणि गळनिंव येथील अनेक शेतकरी यामुळे हैराण झाले आहेत. धरणाची १५२२ घनमीटर पातळीपेक्षा हे पाणी जास्त असल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ते वाढीव पाणी खाली सोडा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
या ३५ गावांच्या बिगर संपादित शेतजमिनी धोक्यात...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या गंगापूर तसेच पैठण तालुक्यातील कायगाव, अंमळनेर, लखमापूर, गणेशवाडी, भिवधानोरा, थनगरपट्टी, गळनिंब, अगरवाडगाव, पखोरा, पूरी, नेवरगाव, हैबतपूर, वाहेगाव, कानडगाव, ममदापूर, बगडी, मांजरी, माहूली, जामगाव, नबाबपुरवाडी, सीतापुरवाडी, कोडापूर, झांजडीं, हर्सुली, देवकरवाडी, पांढरओहळ, मांडवा, शेंदुरवादा, सावखेडा, महालक्ष्मीखेडा, शंकरपूर, बोरुडी, तळपिंप्री, शिवपूर, तांदूळवाडी. या गावांच्या बिगर संपादित जमिनी धोक्यात आल्या आहेत.
पूररेषेपुढे पाणी का पसरतेय ?
• मागील सलग चार वर्षापासून हे पाणी संपादित जमिनींच्या पुढे पसरू लागले. याला धरणातील गाळ हे प्रमुख कारण असल्याचे जाणकारांचे मत आहे.
• धरण झाल्यापासून गोदावरी आणि प्रवरा नदीतून पाण्याबरोबर वाहून आलेल्या गाळामुळे धरण आणि बॅकवॉटरची साठवणूक क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे.
• क्षमता कमी झाल्यामुळे नदीला पूर आल्यास संपादित क्षेत्र भरून पाणी बिगर संपादित जमिनीकडे पसरते.
