Join us
Daily Top 2Weekly Top 5

उजनी धरणात आजमितीला किती पाणीसाठा? यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 13:07 IST

ujani dam water level गेल्या दीड महिन्यात धरणाची पाणी पातळी फक्त ३१.१३ टक्के घटली आहे. गतवर्षी मुसळधार पावसामुळे उजनी धरण जुलै महिन्यातच १०० टक्के भरले होते.

करमाळा : उन्हाळ्याची चाहूल लागली असून, यंदाचा उन्हाळा त्रासदायक नसेल कारण उजनी धरणात तब्बल ६८.८७ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

गेल्या दीड महिन्यात धरणाचीपाणी पातळी फक्त ३१.१३ टक्के घटली आहे. गतवर्षी मुसळधार पावसामुळे उजनी धरण जुलै महिन्यातच १०० टक्के भरले होते.

गेल्या दीड महिन्यात भीमा नदीसह सीना बोगदा कालव्यातून पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने तब्बल ३२ टक्के पाणी पातळी कमी झाली आहे.

२७ फेब्रुवारी रोजी धरणात ६८.८७ टक्के म्हणजे ३६.८९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. मृतसाठा धरून एकूण पाणीसाठा १०० टीएमसी आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा उजनीत समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता कमी आहे.

उजनी धरणातून भीमा नदीत ४,४०० क्युसेक व वीज निर्मितीसाठी १,६०० क्युसेक असा एकूण ६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

हे पाणी शेळगी बंधाऱ्यापर्यंत पोहोचल्यानंतर विसर्ग बंद केला जाणार आहे. धरणातून शेतीसाठी उजनी मुख्य कालवा भीमा, सीना जोड कालवा, दहिगाव, शिरापूर व माढा उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्यात येत आहे.

समांतर जलवाहिनीमुळे सहा टीएमसीची बचत◼️ सोलापूर शहराला पिण्यासाठी समांतर जलवाहिनी सुरू झाल्यामुळे पाच ते सहा टीएमसी पाण्याची बचत होणार आहे.◼️ दरवर्षी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि पावसाळा लांबल्यास जून जुलै महिन्यात उजनीतून सोलापूर शहराच्या पिण्यासाठी भीमा नदीत पाणी सोडले जात होते.◼️ चिंचपूर बंधाऱ्यातून हे पाणी पाइपलाइनद्वारे उपसले जात होते. परंतु, समांतर जलवाहिनीमुळे जूनमध्येही शेतीला पाणी मिळण्याची आशा आहे.

धरणातून असे सोडले पाणी◼️ २६ जानेवारीपासून आतापर्यंत धरणातील पाणी पातळी ३२ टक्के कमी झाली आहे.◼️ धरणातून रब्बी हंगामासाठी सुरुवातीला उजनी मुख्य कालवा, जोड कालवा व दहिगाव योजनेतून पाणी सोडण्यात आले होते.◼️ सीना माढा उपसा सिंचन योजना व ५ फेब्रुवारीपासून भीमा नदीत पाणी सोडण्यात येऊन नंतर १२ फेब्रुवारी रोजी बंद करून पुन्हा २२ फेब्रुवारीपासून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.◼️ रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आल्याने पुढील दोन महिन्यासाठी पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.

अधिक वाचा: आता कोणीही धान्यापासून वंचित राहणार नाही; १ एप्रिलनंतर रेशनमध्ये होणार 'हे' मोठे बदल?

English
हिंदी सारांश
Web Title : उजनी धरणात पाणीसाठा: पुरेसा पाणीसाठा, पाणीटंचाईची शक्यता नाही

Web Summary : उजनी धरणात 68.87% पाणीसाठा आहे. सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग होऊनही पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे. सोलापूरच्या समांतर जलवाहिनीमुळे पाण्याची बचत होते. पुरेसा साठा आणि कार्यक्षम जलव्यवस्थापनामुळे यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईची शक्यता नाही.
टॅग्स :उजनी धरणपाणीधरणशेतीसोलापूरशेतकरीपाटबंधारे प्रकल्पपाऊस