टेंभुर्णी : सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले उजनी मंगळवार, २७ रोजी सकाळी ९ वाजता मृत साठ्यातून बाहेर आले अन् उपयुक्त पाणीपातळीकडे वाटचाल सुरू केली. १८ मेपासून उजनी धरणाचीपाणीपातळी वाढत आहे.
दौंड येथून ३४ हजार २३४ क्युसेक विसर्ग उजनीत मिसळत असून, धरणाची उपयुक्त पाणीपातळी सायंकाळी ६ वाजता ३.९६ टक्के झाली आहे. उजनी धरणात एकूण ६५.७८ टीएमसी पाणीसाठा झाला असून २.१२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
गेल्या २४ तासांत ९ टक्के पाणीपातळी वाढली असून, नीरा नरसिंहपूर येथे नीरा भीमा संगम येथे १२ हजार ५०४ क्युसेक विसर्ग असून, पंढरपूर येथे २६ हजार ५०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.
उजनी पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे दौंड येथील विसर्गात सकाळपासून वाढ होत आहे. सकाळी सहा वाजता २६ हजार १०६ तर दुपारी ३३ हजार ३७२ क्युसेक होता. सायंकाळी ३४ हजार २३४ क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे.
सोमवारी ५४ मिलिमीटर पावसाची नोंद उजनी धरण क्षेत्रात झाली असून, गेल्या १० दिवसांत २३२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. एकूण वर्षभरात ८१७ मिलिमीटर पाऊस पडला आहे. उजनी पूर्ण क्षमतेने भरल्यास जिल्ह्यात आडसली ऊस लागवडीला वेग येणार आहे.
६३.६६ टीएमसी मृतसाठा◼️ सध्या उजनीत २.१२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला असून, एकूण शंभर टक्के भरल्यानंतर ११७ टीएमसी पाणीसाठा धरला जातो.◼️ तर त्यातील ६३.६६ टीएमसी मृत साठ्यात धरला जातो. ५३.३४ टीएमसी उपयुक्त शेतीसाठी धरला जातो.◼️ धरणाची क्षमता १२३ टीएमसीपर्यंत असून, राज्यातील सर्वाधिक मृत साठ्यातील धरण म्हणून उजनीची ओळख आहे.
अधिक वाचा: शेतजमिन वाटणीपत्राच्या दस्त नोंदणीस लागणारी फी माफ; काय आहे निर्णय? वाचा सविस्तर