टेंभुर्णी : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणाचीपाणी पातळी २५.७९ टक्के झाली असून, उजनी धरणात १४ टीएमसी उपयुक्त पाणी साठा झाला आहे.
सध्या एकूण ७७.४८ टीएमसी पाणी साठा झाला आहे. सध्या दौंड येथून येणारा विसर्ग घटत असून, ६ हजार ३७५ क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे.
अवकाळी पावसामुळे उजनी धरणाची पाणी पातळी गेल्या १५ दिवसात ५४ टक्के वाढली आहे. तर, गतवर्षीच्या तुलनेत उजनी धरणात ४६ टीएमसी जास्त पाणी साठा झाला आहे.
गतवर्षी ३१ टीएमसी पाणी साठा शिल्लक राहिला होता. १ जून रोजी वजा ५९ टक्केपर्यंत पाणी पातळी खालावली होती. सध्या उजनी पाणलोट क्षेत्रातील पाऊस थांबल्याने विसर्गात घट होत चालली आहे.
गतवर्षर्षीदेखील पावसाळा लवकर चालू झाल्याने उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली होती. गतवर्षी उजनी मायनसमधून बाहेर यायला दोन महिन्याचा कालावधी लागला असला तरी वजा ५९ पर्यंत पाणी पातळी खाली गेली होती.
तर, एकाच दिवसात २५ टक्केपर्यंत पाणी पातळी वाढली होती. चार दिवसात उजनी ५० टक्के झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत दोन महिने अगोदर उजनी मृत साठ्यातून बाहेर आली असली तरी सध्या पाऊस थांबल्याने उजनी कधी ५० टक्के भरणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.
जुलैपर्यंत शेतीला पाणी मिळू शकते..
- सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने उजनीतून पाण्याची मागणी होणार नाही.
- मात्र, उजनी ५० टक्क्यांचे पुढे गेल्यानंतर आडसली ऊस लागवडीस वेग येत असतो.
- उजनीत समाधानकारक पाणी साठा झाला असल्याने वर्षभराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
- उजनी शंभर टक्के भरल्यास सोलापूर शहरासाठी उजनी समांतर जलवाहिनी चालू झाल्याने पुढील वर्षी पाण्याची बचत होणार असून जून, जुलैपर्यंत शेतीला पाणी मिळू शकते.
अधिक वाचा: शेतकऱ्यांसाठी आलेला २५ कोटींचा युरिया जातोय उद्योजकांच्या घशात; काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर