चंदगड : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे घटप्रभा धरण गेल्या वर्षीच्या तुलनेत पंधरा दिवस अगोदरच भरले असून, मंगळवारी सकाळी ओव्हरफ्लो झाले.
जिल्ह्यातील हे पहिले धरण जूनच्या पहिल्या पंधरवड्यात भरले आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील घटप्रभा, ताम्रपर्णी, हाजगोळी या नद्यांसह अनेक ओढ्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
घटप्रभा धरण मंगळवारी सकाळी ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
घटप्रभा धरणातून ४०० क्युसेक विसर्ग सुरू असून, कोणताही बंधारा पाण्याखाली गेलेला नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे धरण यंदा १५ दिवस अगोदरच भरले आहे.
जंगमहट्टी धरण ४० टक्के, तर जांबरे प्रकल्प ७२ टक्के भरला आहे. मंगळवारीही पावसाचे प्रमाण अधिक होते. तिलारी येथील वाहून गेलेला रस्ता कंत्राटदारांनी दुरुस्त केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
सध्या सुरू असलेला पाऊस रताळी पिकासाठी पोषक असल्याने माळरानावर त्याची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
पावसामुळे शिवारात यंदा जून महिन्यातच पाणी उभे राहिल्याने भाताचा पेरलेला तरवा कुजण्याची भीती आहे. तरवे कुजले तर भात लावणार कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
अधिक वाचा: राज्यात ११.७० लाख हेक्टरवर खरीप पेरण्या; कोणत्या पिकाची झाली सर्वाधिक पेरणी?