ढगाळ हवामानामुळे वातावरणात सूर्यप्रकाश कमी प्रमाणात मिळत असून, परिणामी किमान तापमान तुलनेने स्थिर असतानाही गारठा वाढल्याचे जाणवत आहे. दरम्यान, आगामी २ व ३ फेब्रुवारी रोजी पश्चिम वऱ्हाडात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे.
अकोला जिल्ह्यात शनिवारी किमान तापमान १५.७ अंश व कमाल तापमान ३१.८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. तापमान फारसे घसरले नसले तरी सततच्या ढगाळ वातावरणामुळे सकाळ व रात्रीच्या वेळी थंडी अधिक जाणवत आहे. विशेषतः ग्रामीण भागात पहाटेच्या वेळी गार वारे वाहत असल्याने नागरिकांना थंडीचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, पश्चिम विक्षोभाच्या प्रभावामुळे विदर्भातील काही भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. याच प्रणालीमुळे आगामी दोन दिवसांत अकोला, अमरावती, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांच्या काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या पावसामुळे तापमानात फारसा बदल होणार नसला, तरी आर्द्रता वाढल्याने गारठा कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, हवामानातील या बदलांचा परिणाम शेतीवरही होण्याची शक्यता आहे.
ढगाळ वातावरणामुळे गारठा अधिक जाणवत आहे. दरम्यान, येत्या २ व ३ फेब्रुवारी रोजी अकोला तसेच लगतच्या जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. - डॉ. प्रवीण कुमार, हवामान शास्त्रज्ञ, प्रादेशिक हवामान केंद्र.
रब्बी पिकांवर परिणाम!
सध्या काढणीच्या टप्प्यात असलेल्या हरभरा, गहू व इतर रब्बी पिकांवर ढगाळ वातावरण आणि संभाव्य पावसाचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन काढणी व साठवणुकीबाबत आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. आगामी काही दिवस पश्चिम वहऱ्हाडात ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : तूर शेती ठरतेय शेतकऱ्यांना फायद्याची; पारंपरिक पिकांना फाटा देत तयार होतंय तूर हब
