Join us

मागील वर्षीच्या तुलनेत उजनीच्या पाणीसाठ्यात मोठी घट; धरण लवकरच मायनसमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 10:54 IST

Ujani Dam Water Level सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी १८ ते २० एप्रिलपर्यंत मृत साठ्यात जाणार असून, यानंतर कालवा वगळता शेतीसाठी सोडण्यात येणारे पाणी बंद होणार आहे.

गणेश पोळटेंभुर्णी : सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी १८ ते २० एप्रिलपर्यंत मृत साठ्यात जाणार असून, यानंतर कालवा वगळता शेतीसाठी सोडण्यात येणारे पाणी बंद होणार आहे.

यामुळे पुढील दोन महिने अडचणीचे ठरणार आहेत. उजनी बँक वॉटर क्षेत्रात पाणी खाली चालल्याने केबल व पाईपलाइन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झालेली आहे.

सोलापूर व नदीकाठच्या गावांना भीमा नदीतून पाणी सोडल्याने दररोज एक टीएमसी पाणी घटत आहे. नदीतून सोडण्यात आलेले पाणी १७ एप्रिलपर्यंत चालणार आहे.

सध्या धरणात केवळ सहा टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. सध्या उजनी धरणाची पाणी पातळी ११. ८० टक्के राहिली असून गतवर्षी वजा ३८.८८ टक्के पाणी पातळी खालावली होती.

साधारणपणे एप्रिलअखेर ते मे पहिल्या आठवड्यात उजनी मृत साठ्यात जात असते. गतःवर्षी दुष्काळी स्थिती असल्याने. उजनी २१ जानेवारी २४ रोजी मृत साठ्यात गेले होते.

सध्या भीमा नदीत सोडण्यात आलेले पाणी २० एप्रिलपर्यंत चालणार असून, त्यानंतर मुख्य कालवा वगळता इतर पाणी योजना बंद होणार आहेत, तर मुख्य कालवा १५ ते २० मे पर्यंत चालणार असल्याची माहिती उजनी धरण व्यवस्थापक अभियंता प्रशांत माने यांनी दिली.

गेल्या पाच वर्षांतील १३ एप्रिल रोजीची स्थिती१३ एप्रिल २०२१ रोजी ३० टक्के१३ एप्रिल २२ रोजी ५०.३० टक्के१३ एप्रिल २३ रोजी १८.२८ टक्के१३ एप्रिल २४ रोजी वजा ३८. ८८ टक्के१३ एप्रिल २५ रोजी ११ टक्के पाणी पातळी आहे.

गत वर्षीचा तुलनेत ५०.६८ टक्के पाण्याचा अधिक वापर झाला आहे. गतवर्षी दुष्काळी स्थिती असल्याने उन्हाळी पाळी देण्यात आली नव्हती.

तीन पाळ्यांत धरणातून भीमा नदीत पाणीभीमा नदीद्वारे सोडण्यात आलेल्या तीन पाळ्यांत १८ ते २० टीएमसी पाण्याचा वापर होतो. डिसेंबर, फेब्रुवारी व त्यानंतर ८ एप्रिल असे तीन पाळ्यांत धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आलेले आहे. त्यानंतर आषाढी वारीला उजनीतून भीमा नदीत पाणी सोडले जाऊ शकते.

पुढील दोन महिने शेतकऱ्यांसाठी चिंतेचेउजनीत सध्या ६.३२ टीएमसी उपयुक्त पाणी साठा असून, पावसाळा आणखी दोन महिने लांबणीवर आहे. पावसाळा लांबल्यास दोन महिने शेतकऱ्यांसाठी चिंतेचे असणार आहेत. उजनी धरणातून आतापर्यंत विविध तरतुदीतून उपयुक्त ४७ टीएमसी पाण्याचा वापर झालेला आहे. धरणात सध्या एकूण ६९ टीएमसी पाणी साठा शिल्लक राहिलेले आहे. ६३.६६ टीएमसी मृत साठ्यात धरले जाते.

अधिक वाचा: २० गुंठ्याच्या पेरू लागवडीतूनही होता येतंय लखपती; तरुण शेतकरी विक्रमची यशकथा

टॅग्स :उजनी धरणपाणीनदीसोलापूरशेतीशेतकरीपीकदुष्काळधरण