भंडारदरा लाभक्षेत्राकरिता सिंचन आणि बिगर सिंचनाचे एकत्रित आवर्तन ८ फेब्रुवारीपासून सोडण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
या संदर्भात मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत सोमवारी चर्चा केली. लाभक्षेत्रात पाण्याची असलेली वाढती मागणी, उन्हाची वाढलेली तीव्रता लक्षात घेऊन शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तनाचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
त्यानुसार जलसंपदा विभागाने ८ फेब्रुवारीपासून सिंचन व बिगर सिंचनाचे एकत्रित आवर्तन सोडण्याचे नियोजन केले आहे.
बैठकीनंतर विखे पाटील म्हणाले, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची मागणी आणि उन्हाची वाढलेली तीव्रता लक्षात घेऊन आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आवर्तनाचा लाभ रब्बी पिकांना होईल, परंतु या बरोबरीने ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे.
उन्हाची तीव्रता वाढल्याने काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्याही निर्माण झाली आहे. या आवर्तनाचा या गावांनाही लाभ व्हावा, या उद्देशाने सिंचन आणि बिगर सिंचन असे एकत्रित आवर्तन सोडावे, असे विखे म्हणाले.
उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची दक्षता जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी, तसेच शेतकऱ्यांनीही योग्य विनियोग करावा, असे विखे पाटील म्हणाले.