वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे आणि ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार दि. १५ मे रोजी जळगाव जिल्ह्याच्या अंजनी धरणातून पिण्याचे सिंचन आवर्तन सोडण्यात येणार आहे.
निवासी जिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांच्या आदेशानुसार गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांनी अंजनी धरणातून सुमारे १५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग अंजनी नदीपात्रात सोडण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
या आवर्तनाच्या माध्यमातून धरणगाव तालुक्यातील तब्बल ११ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता मार्गी लागणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. धरणगाव तालुक्यातील कल्याणे (खु.), वाघळूद, चावलखेडा, पिंपळेसीम, भोद बु, हणमंतखेडे खु., पिंप्री खु, कल्याणेहोळ, भोद खु, हिंगोणे खु. आणि सतखेडा या ११ गावांना या आवर्तनाचा लाभ मिळणार आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार हे आवर्तन पिंप्रीमार्गे सोनवदपर्यंत सोडण्यात येणार आहे. आवर्तनाचे पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित असल्याने नदीकाठच्या सर्व शेतकऱ्यांनी शेतीसाठीचे मोटारपंप बंद ठेवावेत, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.
'पाणी जपून वापरा'
सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून ग्रामीण भागात पाण्याची परिस्थिती गंभीर बनत आहे. प्रशासनाने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून हे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
नागरिकांनी पिण्याचे पाणी जपून, काटकसरीने आणि जबाबदारीने वापरावे. पाण्याचा अपव्यय टाळणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.
