गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाला सन २००६ मध्ये तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली होती. ९१७ कोटी रुपयांच्या या सिंचन प्रकल्पामुळे गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील ६५ हेक्टरला सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यास या प्रकल्पामुळे मोठी मदत झाली. या प्रकल्पात कुठलीही अडचण येणार नाही याची तेव्हा अजित पवार यांनी काळजी घेतली होती. त्यामुळे या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात अजित पवार यांचा सिंहाचा वाटा राहिला.
राष्ट्रवादी (अजित पवार) नेते खा. प्रफुल्ल पटेल यांच्या दूरदृष्टीतून व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा दोनची आणखी करण्यात आली. राष्ट्रवादी (अजित पवार) चे तत्कालीन आ. दिलीप बन्सोड यांच्या विधानसभा क्षेत्रातील हा महत्त्वपूर्ण प्रकल्प होता. हा प्रकल्प वैनगंगा नदीतून पाणी उपसून परिसरातील जलाशयांना पुरवठा करतो.
धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाचे दोन मुख्य टप्पे आहेत. टप्पा २ साठी सुमारे २९० कोटी रुपये खर्च होत असून १०३,८२५ हेक्टर जमिनीला सिंचन मिळेल. यात ३२७ एमसीएम वैनगंगा नदीचे पाणी आणि ३६३ एमसीएम तलावातील पाणी वापरले जाते. लाभ क्षेत्र प्रकल्पातून बोदलकसा, चोरखमारा, रिसाला आणि भदभद्या तलावांना पाइपलाइनद्वारे पाणी सोडले जाते.
यामुळे १०,००० हेक्टरपेक्षा जास्त शेतीला सिंचन उपलब्ध होईल. ज्यात ३०,००० हेक्टर ओलीत क्षेत्र होईल. जानेवारी २०२५ मध्ये चोरखमारा प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे नूतनीकरण सुरू झाले. भविष्यातील योजना टप्पा २ पूर्ण झाल्यावर चार जलाशयांमध्ये पाणी सोडले जाईल व शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळेल. धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. लवकरच या प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु होवू शेतकऱ्यांची सिंचनाची अडचण दूर होण्यास मदत होईल.
अजित पवारांचे गोंदिया जिल्ह्याशी दृढ संबंध
राष्ट्रवादी (अजित पवार) चे नेते खा. प्रफुल पटेल हे गोंदिया जिल्ह्याचे असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गोंदिया जिल्ह्याशी दृढ संबंध होते. जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्याकडे एखादी काम घेऊन गेले की ते तेवढ्याच प्राधान्याने पूर्ण करीत होते. तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचीसुद्धा तेवढ्याच आस्थेने विचारपूस करीत होते असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
अजित पवारांनी धानाला जाहीर केला होता सर्वाधिक बोनस
• गोंदिया-भंडारा हे जिल्हा धान उत्पादक जिल्हे असून, या जिल्ह्यांत सर्वाधिक धानाचे उत्पादन घेतले जाते. धान उत्पादकांना प्रोत्साहन अनुदान म्हणून दरवर्षी शासनाकडून बोनस जाहीर केला जातो.
• सन २०१९ मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धानाला प्रती क्विंटल ७०० रुपये बोनसची घोषणा नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केली होती. जेव्हापासून धानाला बोनस देण्यास सुरुवात झाली तेव्हापासूनची ही सर्वाधिक बोनसची रक्कम होती. याचा पूर्व विदर्भातील लाखो शेतकऱ्यांना लाभ झाला होता. त्यामुळे धान उत्पादकांच्या स्मरणात नेहमीच अजित पवार राहतील.
