अहिल्यानगर : मे, जून महिन्यात झालेल्या दमदार पावसानंतर जिल्ह्यातील धरण साठ्यात गतवर्षीपेक्षा दुपटीने वाढ झाली आहे. मोठे प्रकल्प ३० टक्के तर मध्यम प्रकल्प ६० टक्क्यांहून अधिक भरले आहेत.
जिल्ह्यात यंदा मे महिन्यांत जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाचे प्रमाण अधिक आहे. नगर, पारनेर, कर्जत, पाथर्डी, श्रीगोंदा आणि शेवगाव तालुक्यात सरसरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
मागील वर्षी १५ जूनपर्यंत जिल्ह्यातील मोठे प्रकल्प आणि दक्षिणेतील मध्यम प्रकल्पात पाणीसाठा निम्म्याने कमी होता. यंदा जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा दुपटीने वाढला आहे.
जिल्ह्यात मे महिन्यात २२० मिमी अवकाळी पाऊस झाला आहे. तर जून महिन्यात आतापर्यंत ५६.२ मिमी पाऊस पडला आहे. निळवंडे, मुळा आणि भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
दक्षिणेतील मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने लवकरच १०० टक्के प्रकल्प भरतील. गतवर्षी प्रमाणे यंदाही दक्षिणेत पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यातील उत्तर भागात मुळा ३५.१८ टक्के, भंडारदरा २१.७५ टक्के आणि निळवंडे धरण ३१.०६ टक्के भरले आहे. दक्षिणेतील मध्यम प्रकल्पातील आढळा ५३.३० टक्के, मांडओहळमध्ये ६१.४८ टक्के, तर खैरी ३०.७१ टक्के आणि विसापूर ७३.८२ टक्के भरले आहे.
कर्जत तालुक्यातील सीना धरण जूनमध्ये ९६.७५ टक्के भरले असून शनिवारपासून ३६४ क्युसेक वेगाने नदी पात्रात विसर्ग सोडला जात आहे.
जिल्ह्यातील सद्यस्थितीत पाणीसाठा (द.ल.घ.फू)
प्रकल्प - २०२४ - २०२५
भंडारदरा - १,१२७ - २,४०१
मुळा - ६,०८३ - ९,१४६
निळवंडे - ६५० - २,५८४
आढळा - ३७६ - ५६५
मांडओहळ - २८ - २४५
सीना - ३०८ - २,३२२
खैरी - ६८ - १६४
विसापूर - ५० - ६६८
१५ जूनला सुरु असलेला विसर्ग (क्युसेक)
भीमा नदी- दौंड पूल विसर्ग - १३,२३३
घोड नदी - घोड धरण विसर्ग - ४,०००
गोदावरी नदी - नांदूर धरण विसर्ग - २००
सीना नदी - सीना धरण विसर्ग - ३६४
अधिक वाचा: बनावट दस्त व कुलमुखत्यारपत्र नोंदणी कायदा बदलणार; काय होणार बदल? वाचा सविस्तर