सांगली: कोयना धरणाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यामुळे शुक्रवार, २० मार्च रोजी सकाळी ९ वाजल्यापासून धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे.
सिंचनाची वाढती मागणी लक्षात घेऊन कोयना धरण व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. सध्या कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातून २१०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.
त्यात नदी विमोचकातून आणखी १५०० क्युसेक पाणी सोडण्याची योजना असल्याने कोयना नदीत एकूण ३६०० क्युसेक विसर्ग होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील टेंभू ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनांना मोठा आधार मिळणार आहे.
कोयना धरणाच्या स्टिर्लिंग बेसिनच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यामुळे आता विसर्ग वाढवणे शक्य झाले आहे. आतापर्यंत मर्यादित क्षमतेने सुरू असलेल्या योजनांना आता पूर्ण क्षमतेने चालना मिळणार आहे.
सध्या टेंभू योजनेचे सुमारे ५३ टक्के, ताकारी योजनेचे टक्के आणि म्हैसाळचे जवळपास ५० टक्के पंप कार्यरत ६३ होते. मात्र, वाढीव विसर्गानंतर या तिन्ही योजनांचे पंप पूर्ण क्षमतेने सुरू होतील, अशी अपेक्षा आहे.
उन्हाळी हंगामासाठी पाण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. कोयना धरणातून टेंभू आणि ताकारी योजनांना पाणी पुरवठा होणार आहे. म्हैसाळ योजनेसाठी कोयना आणि वारणा धरणातून संयुक्तपणे पाणी दिले जाणार आहे.
सध्या कोयना धरणात ६२.५१ टीएमसी तर वारणा धरणात १७.७७ टीएमसी इतका जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. वारणा धरणातून १७७० क्यूसेक विसर्ग सुरू असून, दानोळी बंधाऱ्यावर सुमारे ८०० क्युसेक पाणी पोहोचत आहे.
उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता हा वाढीव विसर्ग शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा ठरणार आहे.
अधिक वाचा: राज्यातील धरणांमध्ये ५८ टक्के उपयुक्त पाणीसाठा; उजनी, जायकवाडी व कोयनेत किती पाणी शिल्लक?
