सचिन काकडे
सातारा : शेती हा तोट्याचा व्यवसाय आहे, असे म्हणणाऱ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी कामगिरी कराड तालुक्यातील पाली येथील प्रयोगशील शेतकरी पांडुरंग साहेबराव कुंभार यांनी करून दाखवली आहे.
केवळ २० गुंठे क्षेत्रात दोडक्याची लागवड करून त्यांनी अवघ्या चार महिन्यांत साडेतीन लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे.
अल्प क्षेत्रातही शास्त्रशुद्ध नियोजनाच्या जोरावर आर्थिक समृद्धी कशी साधता येते, याचा वस्तुपाठच कुंभार यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे.
पांडुरंग कुंभार यांची शेती हीच त्यांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार. पारंपरिक पिकांना फाटा देत त्यांनी नवनवे प्रयोग करण्यावर भर दिला.
यंदा त्यांनी २० गुंठे क्षेत्रात दोडका लावण्याचा निर्णय घेतला. जमिनीची योग्य मशागत करून प्रतिचार फुटांवर रोपांची मांडणी केली.
दोडक्याचे वेल सक्षमपणे वाढावेत आणि फळांची गुणवत्ता टिकावी यासाठी त्यांनी शेतात दोरी काठी उभी करून आधार दिला. यामुळे वेलांना जमिनीचा स्पर्श होत नाही आणि फळांची लांबी व रंग उत्कृष्ट राहतो.
रासायनिक खतांवर अवलंबून न राहता, त्यांनी कंपोस्ट आणि सेंद्रिय खतांच्या वापरावर भर दिला. यामुळे पिकाची वाढ झटपट झाली आणि जमिनीचा कसही टिकून राहिला.
योग्यवेळी पाणी व्यवस्थापन आणि आवश्यक पोषणमूल्ये पुरविल्यामुळे पिकाने जोम धरला, परिणामी, अवघ्या २० गुंठ्यातून त्यांनी ८ टन उत्पादनाचा टप्पा गाठला.
आंतरपिकातून उत्पन्न
◼️ कुंभार यांच्या कल्पकतेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी दोडक्यासोबत कांद्याचे आंतरपीक घेतले.
◼️ यासाठी त्यांना वेगळी मशागत, पाणी किंवा खतांची गरज भासली नाही.
◼️ दोडक्याला दिलेली खते आणि पाण्यावरच १ टन कांद्याचे अतिरिक्त उत्पादन त्यांना मिळाले.
◼️ दोडका पिकाला आरोग्यदायी मानले जात असल्याने बाजारातही मोठी मागणी असते.
◼️ योग्य व्यवस्थापन केल्यास अल्पभूधारक शेतकरीही आर्थिक समृद्ध होऊ शकतो, हे कुंभार यांनी सिद्ध केले आहे.
सत्तर ते ऐंशी हजार रूपये आला खर्च
◼️ या संपूर्ण प्रयोगासाठी कुंभार यांना बियाणे, मशागत, मजुरी आणि खते असा मिळून सुमारे ७० ते ८० हजार रुपये खर्च आला.
◼️ मात्र, अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीत त्यांना ३.५ ते ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.
◼️ म्हणजेच, खर्च वजा जाता त्यांना सुमारे पावणेतीन लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला.
◼️ आता त्यांनी पुन्हा एकदा दोडक्याची लागवड केली आहे.
शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता बाजारपेठेची गरज ओळखून बदल केला पाहिजे. शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि सेंद्रिय खतांच्या जोरावर शेती केली, तर कमी जमिनीतही भरघोस यश मिळते. - पांडुरंग कुंभार, प्रयोगशील शेतकरी, पाली
अधिक वाचा: ना कोणते खत, ना माती तरीही पिकतेय दर्जेदार लालचुटुक स्ट्रॉबेरी; वाचा संपतरावांच्या शेतीची कहाणी
