दिलीप पाडळे
पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील कासवंड गावात नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या राजबेरी (रास्पबेरी) या फळाने आता व्यावसायिक शेतीचे रूप धारण केले आहे.
स्थानिक शेतकऱ्यांसाठी हे उत्पन्नाचे भक्कम साधन ठरत आहे. एकेकाळी जंगलात आणि डोंगराळ भागात सहज वाढणारी ही झुडुपवर्गीय वनस्पती आता नियोजनबद्ध पद्धतीने लागवडीत आणली जात आहे.
त्यामुळे कासवंड गावाला 'राजबेरीचे गाव' म्हणून नवी ओळख मिळू लागली आहे. कासवंड परिसरात सध्या सुमारे १५ ते १६ एकर क्षेत्रावर राजबेरीची शेती केली जात आहे.
गावातील जवळपास ७० टक्के क्षेत्र या पिकाखाली आले आहे. नोव्हेंबरपासून एप्रिल-मे महिन्यापर्यंत या झाडांना फळधारणा होते.
थंड आणि दमट हवामान या पिकासाठी अत्यंत पोषक असल्याने महाबळेश्वर परिसरात याची वाढ उत्तम प्रकारे होत आहे. उत्पादनाच्या दृष्टीनेही हे फळ फायदेशीर ठरत आहे.
एका गुंठ्यातून दर तीन दिवसांनी सरासरी अडीच ते तीन किलो फळे मिळतात. महिन्याला सुमारे २७ ते ३० किलो, तर सात महिन्यांच्या कालावधीत २०० ते २१० किलो उत्पादन मिळते
बाजारात चांगला दर मिळाल्यामुळे एका गुंठ्यातून ४० ते ४५ हजार रुपये उत्पन्न मिळते. एकरी उत्पन्न साडेचार ते पाच लाखांपर्यंत पोहोचते.
विशेष म्हणजे, हे झाड सलग सात महिने उत्पन्न देते आणि त्याचा खर्चही अत्यल्प असतो. राजबेरी हे 'रुबस' प्रजातीतील काटेरी झुडूप असून, त्याची फळे लाल किंवा काळ्या रंगाची असतात.
'क' जीवनसत्त्व, फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह यांसारख्या पोषक घटकांनी समृद्ध असल्यामुळे या फळाला आरोग्यदृष्ट्याही मोठी मागणी आहे. जॅम, जेली, सरबत, केक आणि विविध डेझर्ट्समध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
डोंगराळ भागातील निचरा होणारी सुपीक जमीन आणि थंड हवामान या पिकासाठी अनुकूल असल्याने राजवेरी ही शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर पर्याय ठरत आहे.
कृषी पर्यटनाला चालना
गेल्या वर्षी कृषी पर्यटन विकास महामंडळाने कासवंड गावाला 'राजबेरीचे गाव' म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे या भागाच्या कृषी पर्यटनालाही चालना मिळत आहे.
मी स्वतः २५ गुंठ्यांत राजबेरीची शेती करतो. या फळाला रासायनिक खते किंवा कीटकनाशकांची गरज भासत नाही. नैसर्गिकरित्या उगवणारी रोपे वापरून लागवड करता येते. गावातच नर्सरी उपलब्ध असल्याने रोपांची सोय सुलभझाली आहे. खर्च कमी आणि उत्पन्न जास्त असल्यामुळे हे फळ शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. - विकास पवार, प्रगतशील शेतकरी, कासवंड
अधिक वाचा: पीकविमा योजनेतून पहिल्या टप्प्यातील नुकसान भरपाई जाहीर; 'या' शेतकऱ्यांना मिळणार लाभ
