जगन्नाथ कुंभार
मसूर : पारंपरिक शेतीला बगल देत नगदी पिके घेऊन आर्थिक सुबत्ता वाढविण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.
अशाच प्रकारे कराड तालुक्यातील शहापूर येथील शेतकरी अनिल चव्हाण यांनी पाच महिन्यांत निघणाऱ्या टोमॅटो पिकाची लागवड केली आहे.
यामध्ये त्यांना नैसर्गिक संकट आले नाही, तर एक एकर क्षेत्रात सुमारे ४५ ते ५० टन उत्पादन मिळून नऊ लाखांच्या वर उत्पन्न मिळण्याचा विश्वास आहे.
शहापूर येथील अनिल चव्हाण यांनी एक एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड करण्याचा निश्चय करून सुरुवातीला शेतीची मशागत करताना नांगरट केली.
अधिक वाचा: शेतकरी बांधवांनो कर्जमाफीचा लाभ हवा! तर 'या' कागदपत्राचे आजच प्रमाणीकरण करा
त्यानंतर राख आणि कोंबडी खत टाकून रोटर मारला व पाच फुटी सरी सोडून शेती टोमॅटो लागवडीला तयार केली. त्यामध्ये सरीवर मल्चिंग पेपर अंथरून २१७४ जातीच्या टोमॅटोची रोपाची दोन फुटांच्या अंतरावर लागवड केली.
त्यानंतर बेसल डोस देताना सेंद्रिय व रासायनिक खताचा डोस दिला. रोपाने ग्रीप घेतल्यानंतर डांब रोवून आणि तार ओढून रोपे बांधली.
सुरुवातीला लागण केल्यानंतर आळवणी घालून कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने वेळोवेळी औषधांची फवारणी केली. लागण केल्यानंतर ७० व्या दिवशी टोमॅटो तोडणी केली.
सध्या टोमॅटो लागण करून तीन महिने झाले आहेत. यामध्ये दहा तोडे होऊन २५ टन टोमॅटो निघाला आहे. अजूनही १५ ते २० टन टोमॅटो निघेल, अशी अपेक्षा आहे.
तीन लाख खर्च; सहा लाख रुपयांचा फायदा अपेक्षीत
◼️ टोमॅटोचे पाच महिन्यांत एक एकरात पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे.
◼️ २५ ते ३० रुपये दर सापडला तर एकरामध्ये नऊ लाखांच्या वर उत्पन्न मिळेल, असे अनिल चव्हाण यांनी सांगितले.
◼️ खर्च तीन लाख रुपये वजा केला तर सहा लाखांच्या वर निव्वळ उत्पन्न मिळू शकते.
◼️ बुरशी, पान कुरतडणारी आळी, लाल कोळी या सर्व रोगांवर योग्यवेळी औषधोपचार करत पिकांची काळजी घ्यावी लागते.
शेतकरी वर्गाने परंपरेने आलेली शेती करू नये. प्रयोगात्मक शेती केल्यास भरघोस उत्पन्न मिळून आर्थिक स्रोत वाढण्यास मदत होते. यासाठी शेतकऱ्यांनी नेहमी कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने शेती केल्यास त्याचा फायदा झाल्याशिवाय राहत नाही. - अनिल चव्हाण, शहापूर
अधिक वाचा: एप्रिल ते सप्टेंबर महिन्याच्या लाईट बिलात अजून १५ टक्के सवलत; वाचा कुणाला मिळणार लाभ?
