मुंबई : वीज ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीज वापरासाठी टीओडी (टाइम ऑफ डे) सवलत जुलै २०२५ मध्ये लागू केल्यापासून आतापर्यंत ७० लाख ग्राहकांना एकूण २,२३५ कोटी रुपयांचा लाभ झाला आहे.
त्यामध्ये १५,९०७ उच्चदाब औद्योगिक ग्राहक एकूण १५३४ कोटी रुपयांच्या लाभासह प्रथम स्थानावर आहेत.
'महावितरण'तर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, विजेचा वापर कोणत्या वेळेत झाला? त्याच्या आधारे वीजदरात सवलत दिली जाते, त्याला टीओडी सवलत म्हणतात.
जुलै २०२५ पासून १० किलोवॅटपेक्षा जास्त भार असलेल्या औद्योगिक व वाणिज्यिक वीज ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीज वापरासाठी सवलत देण्यात आली.
या ग्राहकांना एप्रिल ते सप्टेंबर या महिन्यांसाठी १५ टक्के तर ऑक्टोबर ते मार्च या महिन्यांसाठी २५ टक्के इतकी सवलत देण्यात येत आहे.
सर्व घरगुती ग्राहकांनाही प्रथमच टीओडी सवलतीचा लाभ देण्यास सुरुवात झाली असून चालू आर्थिक वर्षात सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीजवापरासाठी प्रतियुनिट ८५ पैसे सवलत देण्यात येते.
स्मार्ट मीटरमध्ये कोणत्या वेळी किती वीजवापर झाला हे मोजण्याची सुविधा असल्याने स्मार्ट मीटर बसविलेल्या घरगुती ग्राहकांना या सुविधेचा लाभ होत आहे.
राज्यातील उच्चदाब व लघुदाब अशा ११,०१७ वाणिज्यिक ग्राहकांना एकूण २३९ कोटी रुपयांचा लाभ झाला आहे. घरगुती ग्राहकांना टीओडीचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे.
त्यांना १,०९६ दशलक्ष युनिट इतक्या विजेसाठी ८९ कोटी रुपयांचा लाभ झाला आहे. या कालावधीतील लाभधारक घरगुती ग्राहकांची संख्या ६९,३५,३८८ इतकी होती.
राज्यात स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला वेग
◼️ राज्यात घरोघरी स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेने वेग घेतला आहे.
◼️ त्यासोबत टीओडी लाभ मिळणाऱ्या घरगुती वीजग्राहकांची संख्याही वाढत आहे.
◼️ सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीजदरातील सवलतीचा लाभ सार्वजनिक पाणीपुरवठा आणि अन्य सार्वजनिक सेवांसाठीही झाला आहे.
◼️ या घटकांसाठी संबंधित १२,९८९ ग्राहकांना २०२ कोटी रुपयांचा टीओडी लाभ झाला आहे.
अधिक वाचा: एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ; घरगुती सिलिंडर आता किती रुपयाला मिळणार?
