गेल्या १०-१२ दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने संपूर्ण महाराष्ट्रभरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या पावसाने द्राक्ष बागांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी त्यामुळे कमालीचे हवालदिल झाले आहेत.
नाशिक, सांगलीनंतर द्राक्ष उत्पादनात सोलापूर जिल्ह्याचा नंबर लागतो. या पावसाने द्राक्ष शेतीवर संकटाची गडद छाया पसरली आहे. या पावसाने द्राक्ष उत्पादनात मोठी घट होऊ शकते.
काडी परिपक्व होणार नसल्याने द्राक्ष वेलींची वाढ खुंटणार आहे. सध्याच्या काळात द्राक्ष वेलींना सूर्यप्रकाशाची गरज असते. मुबलक सूर्यप्रकाश मिळाला तरच काडीत घडनिर्मिती होऊ शकते.
१० मेपासून सतत पाऊस सुरू आहे. या काळात शेतकऱ्यांनी चुकीची औषधे वापरल्यास त्याचा घडनिर्मितीवर पर्यायाने द्राक्षांच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.
कमी सूर्यप्रकाशात द्राक्ष बागांचे संगोपन, संरक्षण करण्याबाबत द्राक्ष उत्पादकामध्ये संभ्रम आहे. द्राक्ष वेलींच्या खरड छाटणीनंतर तीन टप्प्यांत त्यांची वाढ होते.
पहिल्या महिन्यात शाखीय वाढ, दुसऱ्या महिन्यांत सूक्ष्म घडनिर्मिती, तिसऱ्या महिन्यांत काडी परिपक्व होते. बहुतांश शेतकरी आणखी पहिल्या टप्प्यातच आहेत.
बागेत पावसाचे पाणी साठल्याने आर्द्रता निर्माण झाली आहे. या काळात वेलींची वाढ होते, पानांची संख्या वाढते, पेऱ्यातील अंतर वाढते.
या गर्दीमुळे द्राक्ष घडांच्या डोळ्यावर सूर्यप्रकाश मिळणार नाही. परिणामी, द्राक्ष घडांच्या निर्मितीवर आणि वाढीवर दुष्परिणाम होतो.
पावसामुळे रोगप्रतिकारशक्तीमध्ये घटपावसामुळे रोगप्रतिकारक शक्तीमध्ये घट होते. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. दावण्या, करपा रोगांची वाढ होऊ शकते. नवीन कोवळ्या फुटीवर दावणी रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. सततच्या पावसाने नवीन फुटीच्या शेंड्याकडे करपा रोग येऊ शकतो. भुरी रोगाचा ही प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी जैविकावर भर द्यावा लागेल.
तज्ञांचा सल्ला१) डॉ. आर. जी. सोमकुंवर, द्राक्ष संशोधकशेतकऱ्यांनी आवश्यकतेपेक्षा जास्त खतांचा, औषधांचा वापर करू नये. खतांचा, संजीवकांचा तितक्याच मात्रेने अथवा कमी मात्रेने फवारणी घ्यावी. बगल फुटी काढून टाकने, शेंडा पिंचिंग करणे, शेंड्याची वाढ नियंत्रणात ठेवणे, नत्र पूर्णपणे बंद करून पोटॅश आणि स्फुरदचा वापर करणे आदी उपाय करावे.२) दिलीप माने, द्राक्ष उत्पादक बागायतदार संघ, सोलापूरउशिराने द्राक्षे पक्व झाले, त्यामुळे उशिराच मालाची तोडणी झाली. त्यानंतरच एप्रिलअखेर द्राक्ष वेलींची छाटणी करावी लागली. छाटणीनंतर लगेचच पाऊस सुरू झाला. गरजेइतका सूर्यप्रकाश छाटणीनंतर नवीन घडनिर्मितीसाठी मिळत नाही. परिणामी डाऊनी, करपा, भुरी रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
अधिक वाचा: शेतकऱ्यांसाठी आलेला २५ कोटींचा युरिया जातोय उद्योजकांच्या घशात; काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर