मंचर : कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर येथे पालेभाज्यांचेबाजारभाव कडाडले असून मेथीची एक जुडी तब्बल ६० रुपयांना विकली गेली आहे, अशी माहिती सभापती नीलेश स्वामी थोरात यांनी दिली.
मध्यंतरी पडलेल्या अवकाळी पावसाने पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतातील मेथी, कोथिंबीर व इतर पालेभाज्या पावसाच्या तडाख्याने पिवळ्या पडल्या आहेत. त्यामुळे बाजार समितीत पालेभाज्यांची आवक मंदावली आहे.
पावसाच्या उघडीपीनंतर शेतकऱ्यांनी मेथी, कोथिंबीर, पालक आदी पालेभाज्या शेतात टाकल्या आहेत. मात्र त्याचे उत्पादन निघण्यासाठी अजून बराच कालावधी लागणार आहे. पावसाच्या तडाख्यात ज्यांची पिके वाचली ते पालेभाज्या विक्रीसाठी आणत असले तरी त्याची प्रतवारी ढासळाली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भाजीपाला लिलावाच्या वेळेस मे.आराध्या ट्रेडिंग कंपनी व गुरुकृपा ट्रेडिंग कंपनी राजेंद्र वाबळे व प्रशांत सैद यांच्या अडत गाळ्यावर कळंब येथील शेतकरी सिद्धेश संजय भालेराव यांच्या मेथीला सर्वाधिक उच्चांकी बाजारभाव मिळाला.
प्रति जुडी रुपये ६० असा बाजारभाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुढील काही दिवस बाजारभाव कडाडलेले राहतील अशी माहिती सभापती नीलेश स्वामी थोरात यांनी दिली.
कोथिंबिरीला प्रति जुडी २१ रुपये व शेपू प्रति जुडी २२ असा बाजारभाव मिळाला आहे. शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला मंचर बाजार समितीत विक्रीसाठी आणावा असे आवाहन बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे यांनी केले आहे.
अधिक वाचा: Ranbhajya : पावसाळ्यात येणाऱ्या सर्वगुणसंपन्न सात रानभाज्या कोणत्या? जाणून घ्या सविस्तर