मागीलवर्षी झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम यंदा मिरची व इतर मसाल्याच्या उत्पादनावर स्पष्टपणे दिसून येत आहेत.
पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने बाजारात पुरवठा घटला असून, मिरची-मसाल्यांचे दर गतवर्षीच्या तुलनेत वाढले आहेत. तसेच हे दर आणखी वाढण्याची शक्यता होती.
मात्र, इराण व इस्रायलच्या युद्धामुळे सध्या मिरची निर्यात थांबली असल्याने बाजारातील मिरचीचे दरही स्थिरावले आहेत.
उन्हाळा सुरू झाल्याने बाजारात मिरचीची व मसाल्यांची खरेदी वाढली आहे. अतिवृष्टीमुळे सध्या मिरचीची आवक कमी असल्याने गतवर्षीच्या तुलनेत भाव चढेच आहेत.
मात्र, युद्धामुळे मिरचीची होणारी निर्यात थांबल्यामुळे सध्या पुरेसा माल उपलब्ध असल्याने भडकलेल्या मिरचीचे दर मात्र सध्या स्थिरावले आहेत.
आवक वाढली
◼️ उन्हाळ्यात घरोघरी मसाल्याची चटणी केली जाते.
◼️ याच काळात फेब्रुवारी ते मेपर्यंत उच्च प्रतीची मिरची बाजारात विक्रीसाठी येते.
◼️ सध्या सांगली मार्केट यार्डमध्ये सर्व प्रकारच्या मिरच्या दाखल झाल्यात आहेत.
◼️ उत्पादन घटले असले व गतवर्षीच्या तुलनेत चढे भाव असले तरी बाजारात ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मिरची खरेदी केली जात आहे.
ब्याडगी, संकेश्वरीला मागणी
◼️ आपल्याकडे मसाल्याच्या ठसकेबाज चटणीसाठी ब्याडगी, संकेश्वरी आणि केडीएल ब्याडगी मिरचीला विशेष मागणी आहे.
◼️ बहुतांशी सांगली व परिसरात याच प्रकारची मिरची जास्त प्रमाणात खपली जाते.
कसे सुरु आहेत मिरच्यांचे दर
जुनी देशी : २०० ते २८०
नवीन देशी : २८० ते ३५०
लवंगी : २२० ते २८०
कोल्हापुरी देशी : २८० ते ३५०
बेळगावी देशी : ३५०
ब्याडगी : ३५० ते ७५०
केडीएल ब्याडगी : ६५० ते ८००
काश्मिरी : ८५०
संकेश्वरी : २८० ते ३५०
गुंटूर : २८० ते ३६०
खोबऱ्याचे दर भडकले
◼️ गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे यंदा मसाल्याचे भावही वाढले आहेत. मसाल्याच्या चटणीसाठी खोबरे मोठ्या प्रमाणात वापरले जाते.
◼️ यंदा खोबऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. यामुळे खोबऱ्याला उच्चांकी दर मिळत आहे.
◼️ गतवर्षी २४० रुपये किलोने विकला जाणाऱ्या खोबऱ्याचा दर यंदा ४०० रुपये किलो इतका झाला आहे.
अधिक वाचा: रॉकेल वाटपासाठी गावनिहाय याद्या देण्याचे आदेश; प्रति लिटर काय दराने मिळणार रॉकेल?
