वातावरणातील बदलामुळे यंदा आंबा उत्पादन कमी आहे. मात्र, उष्मा वाढल्यामुळे जो काही आंबा झाडावर आहे, तो लवकर तयार होऊ लागला आहे.
त्यामुळे स्थानिकच नाही तर नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढली आहे. आवक वाढल्यामुळे दरात घसरण झाली आहे.
यावर्षी तुलनेने उत्पादन कमी असताना गडगडल्यामुळे दर बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीपेक्षा स्थानिक बाजारातील आंब्याचे दर बऱ्यापैकी अधिक आहेत.
वातावरणातील विविध समस्यांमुळे यावर्षी जेमतेम १५ ते २० टक्केच पीक असल्याने आधीच बागायतदार चिंताग्रस्त असताना दरातील घसरण बागायतदारांची गणिते विस्कटतणार असल्याचे दिसत आहे.
मार्चपासून आंबा बाजारात येऊ लागला, सुरुवातीला सहा हजार ते १२ हजार रुपये दर पेटीला मिळाला. मात्र, आवक वाढू लागली, तशी दरात घसरण झाली. उष्णता वाढल्याने आंबा लवकर तयार होऊ लागला आहे.
त्यामुळे गेल्या चार पाच दिवसांत तर ७० ते ८० हजार पेट्या नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी गेल्या आहेत. त्यामुळे दर घसरुन १,२०० ते २,५०० रुपये प्रतिपेटी असा झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
अन्य राज्यांतील आंबा
◼️ महाराष्ट्रासह, कर्नाटक, गुजरात, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यातून आंबा विक्रीसाठी येतो.
◼️ कोकणातून ५० ते ५५ हजार पेट्या, तर अन्य राज्यांतून २७ ते ३० हजार पेट्या विक्रीसाठी येत आहेत.
◼️ हापूसची विक्री डझनावर होत असली तरी अन्य राज्यांतील आंबा मात्र किलोवर विकण्यात येत आहे.
स्थानिक बाजारातील दरातही घसरण
◼️ नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच नाही तर स्थानिक बाजारातील दरात घसरण झाली आहे.
◼️ रत्नागिरीच्या बाजारपेठेत हापूस ५०० ते १२०० रुपये, तर पायरी आंबा ८०० ते १,००० रूपये डझन दराने विकण्यात येत आहे.
◼️ गेल्या आठवडाभरात आवक चांगली वाढली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
दर गडगडल्याने ग्राहक वाढले
◼️ सध्या हापूस आंबा ५०० ते १,२०० रुपये डझन दराने विकण्यात येत आहे. बाजारातील आवक वाढल्यामुळे दर गडगडले आहेत.
◼️ मात्र, त्यामुळे ग्राहकांचा खरेदीसाठी प्रतिसाद वाढला असल्याचे सांगण्यात येत आहे.
◼️ उकाड्यामुळे आंबा लवकर तयार होत असल्यामुळे शेतकरी तयार आंबा काढण्याची घाई करत आहेत.
◼️ सर्वसामान्य ग्राहकांसाठी मात्र दरामुळे अद्याप तरी आंबा दूरच आहे.
अधिक वाचा: शेतकऱ्यांना आता जास्तीचे खत खरेदी करता येणार नाही; वाचा कृषी विभागाने काय घेतलाय निर्णय?
