सोलापूर : येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी फळे आणि भाजीपाल्याची मोठी आवक झाली.
यामध्ये प्रामुख्याने डाळिंबाच्या दराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, डाळिंबाला उच्चांकी २४ हजार रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला आहे.
बाजार समितीने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी डाळिंबाची ६०५ क्विंटल इतकी आवक झाली. आवक चांगली असतानाही मागणी टिकून असल्याने दरात मोठी वाढ पाहायला मिळाली.
डाळिंबास कमीत कमी दर ७०० रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर २४ हजार रुपये प्रति क्विंटल असा मिळाला. सर्वसाधारण दर ७ हजार रुपये मिळाला.
धान्य बाजारपेठेत गव्हाची (शरबती) ८२३ क्विंटल आवक होऊन त्याला ४,००० रुपये दर मिळाला, तर तांदळाला (मसुरा) ६,८९५ रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे.
एकूणच मंगळवारी सोलापूर बाजार समितीत डाळिंबाच्या दरातील तेजीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.
इतर फळे आणि भाजीपाल्याची स्थिती
◼️ डाळिंबाव्यतिरिक्त इतर फळांमध्ये हापूस आंब्याची ३०५ नग आवक झाली असून, त्याला जास्तीत जास्त २,४०० रुपये दर मिळाला.
◼️ सफरचंदाचे दर स्थिर असून १५ हजार रुपये प्रति क्विंटलने व्यवहार झाले.
◼️ तसेच, लिंबाला १० हजार रुपये, तर जांभळाला १७ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत उच्चांकी भाव मिळाला.
सभापती दिलीप माने यांची पहाटे पाहणी
पहाटेच्या वेळीच यार्डात पोहोचलेल्या सभापती दिलीप मानेंनी बाजार समितीच्या संपूर्ण आवारात फेरफटका मारत व्यापारी, हमाल आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.
शेतकरी हा बाजार समितीचा कणा आहे. त्याला सन्मानाने वागणूक मिळाली पाहिजे आणि व्यवहार पारदर्शक झाले पाहिजेत. बाजार समितीच्या कामकाजात पारदर्शकता आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी अशा अचानक भेटी नियमितपणे सुरू राहतील. - दिलीप माने, सभापती, बाजार समिती
अधिक वाचा: डाळिंबाचा दर गेला २२ हजारांवर; आता त्याच्यावर चोरट्यांची नजर, तब्बल २० लाखांची फळे गेली चोरीला
