सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाच्या दरात दिवसेंदवस वाढ होत आहे. सोमवारी ५४८ क्विंटल मालाची आवक होती.
कमाल दर प्रतिक्विंटल २२५०० रुपये मिळाला. तर सरासरी दर ६५०० रुपये आहे. त्यामुळे चोरट्यांनी आता रोख रक्कमा, दागिन्यांसह आता शेतातल्या उभ्या पिका-फळांच्या चोऱ्यांकडे मोर्चा वळवला आहे.
तालुक्यातील केम येथे ज्ञानेश्वर गोडसे या शेतकऱ्याच्या डाळिंब बागेवर चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास धाडसी चोरी करून अंदाजे २० लाख रुपयांची डाळिंब लंपास केले.
ही धक्कादायक घटना ३० एप्रिल रोजी उघडकीस आली. तयार डाळिंबाची फळे रातोरात गायब झाल्याने संबंधित शेतकरी हवालदिल झाले असून, पोलिसांपुढे आरोपी शोधण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
केम येथील प्रगतशील ज्ञानेश्वर गोडसे या शेतकऱ्याने व्याजाने कर्ज काढून, लाखो रुपये खर्च करून डाळिंब बाग फुलवली होती.
बाजारात चांगला भाव मिळेल या आशेने काढणीची तयारी सुरू असतानाच चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत संपूर्ण बाग फस्त केली.
अज्ञात वाहनाने डाळिंब नेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बागेत फिरत असताना शेतकऱ्यांना ही बाब लक्षात आली असल्याने प्रकार उघडकीस आला.
कृषी खात्याकडून पंचनामा
◼️ केम येथील सहाय्यक कृषी अधिकारी वाल्मीक अप्पा चौधरी यांनी स्वतः स्थळपाहणी करून चोरीचा पंचनामा केला.
◼️ अहवालानुसार गट नंबर ३६८/१/ड मधील ०.७० हे. क्षेत्रात ६६५ डाळिंबांची झाडे आहेत.
◼️ प्रती झाड १५ किलो या सरासरीने एकूण ९,९७५ किलो उच्च प्रतीची फळे चोरीला गेली.
◼️ सध्याचा बाजार भाव २०५ किलो प्रमाणे चोरीस गेलेल्या मालाची एकूण किंमत २० लाख ४४ हजार ८७५ रुपये एवढी होते.
अधिक वाचा: उसाची थकीत बिलं १५ टक्के व्याजासह मिळणार का? ऊस दर नियंत्रण मंडळाच्या बैठकीत काय झाला निर्णय?
