मंचर : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत पालेभाज्यांची आवक घटल्याने बाजारभाव कडाडले असून, कोथिंबिरीची जुडी तब्बल ५१ रुपयांना, तर मेथीची जुडी ३१ रुपयांना विकली गेली.
या हंगामात पालेभाज्यांना मिळालेला हा उच्चांकी भाव मानला जात आहे. मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या तीव्र उष्णतेचा परिणाम मोठा भाजीपाल्याच्या उत्पादनावर झाला आहे.
वाढत्या तापमानामुळे मेथी, कोथिंबीर यासारख्या पालेभाज्यांची मर होत असून, उत्पादनात घट झाली आहे. त्यातच अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याने पालेभाज्यांचे क्षेत्रही कमी झाले आहे.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत या आठवड्यात कोथिंबीर, मेथी, शेपू आणि पालक यांच्या आवकेत मोठी घट झाली असून, त्याचा थेट परिणाम बाजारभावावर झाल्याची माहिती सभापती नीलेश स्वामी थोरात यांनी दिली.
कमी कालावधीत येणाऱ्या पालेभाज्या अति उष्णतेमुळे नष्ट होत असल्याने बाजारात मालाची टंचाई निर्माण झाली आहे.
विशेषतः आंबेगाव, शिरूर आणि खेड तालुक्यातील काही मोजक्याच क्षेत्रात मेथी व कोथिंबीरचे पीक तग धरून असल्याचे चित्र आहे.
लिलावात कोथिंबिरीची जुडी ५१ रुपयांना, तर मेथीची जुडी ३१ रुपयांना विकली गेली. हा घाऊक बाजारभाव असून, किरकोळ बाजारात ग्राहकांना यासाठी आणखी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
येत्या काही दिवसांतही पालेभाज्यांचे भाव तेजीत राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
अधिक वाचा: शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आखणीला अखेर मंजुरी; आता 'या' १३ जिल्ह्यांतून जाणार हायवे
