करमाळा : करमाळा तालुका हा केळी उत्पादनात जिल्ह्यात अग्रेसर आहे. मात्र सध्या येथील शेतकरी अस्मानी संकटापेक्षा सुलतानी जाचाने अधिक होरपळला जात आहे.
अमेरिका, इराण आणि इस्रायलमधील युद्धाचे निमित्त पुढे करून व्यापाऱ्यांनी एक मोठी साखळी (रिंग) तयार केली आहे. केळीचे भाव जाणीवपूर्वक पाडले आहेत.
दोन रुपयांपासून ते पाच रुपयांपर्यंत केळी खरेदी करून शेतकऱ्यांची उघड लूट केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
करमाळा तालुक्यातून निर्यातक्षम दर्जाची केळी उत्पादित होते. मात्र आजच्या स्थितीत 'ए' ग्रेड मालालाही व्यापारी भडकलेल्या आखातात युद्धामुळे भाव देण्यास तयार नाहीत अशी विचित्र स्थिती आहे.
यामुळे केळी उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. उत्तम दर्जाच्या मालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
खरेदी दीड-दोन रुपयाने आणि विक्री चाळीस रुपयाने
◼️ करमाळ्यातील बाजारात केळी चाळीस रुपये डझन या भावाने ग्राहकांना विक्री केली जात आहे.
◼️ प्रत्यक्षात मात्र व्यापारी आखातात सुरू असलेल्या युद्धाच्या नावाखाली शेतकऱ्याकडून दीड ते दोन रुपये किलो दराने खरेदी करत आहेत.
◼️ करमाळा तालुक्यातील खरेदी केलेला निर्यातक्षम केळी पुणे, मुंबई, ठाणे यासह परप्रांतातील मोठ्या शहरात तेथील ठोक विक्रेत्यांना चढ्या दराने विक्री करून व्यापारी नफा कमवत आहेत. इकडे मात्र शेतकऱ्यांना कवडीमोल दर देत आहेत.
युद्ध तिकडे सुरू आहे आणि त्याचे चटके इथल्या शेतकऱ्यांना दिले जात आहेत. हे केवळ व्यापाऱ्यांचे षडयंत्र आहे. शेतकऱ्यांच्या केळीचे भाव पाडून त्यांची लूट केली जात आहे. जर शासनाने वेळीच दखल घेतली नाही आणि व्यापाऱ्यावर कारवाई केली नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. - विनोद महानवर
उघडपणे होणारी ही लूट थांबवण्यासाठी कृषी विभाग काय नुसती बघ्याची भूमिका घेत आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नाही का? कृषी विभागाने या गंभीर प्रकाराकडे तातडीने लक्ष देऊन व्यापाऱ्यांची मनमानी मोडीत काढावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. - राजेंद्र बारकुंड, केळी उत्पादक चिखलठाण
अधिक वाचा: इतिहासात प्रथमच मालदांडी ज्वारीला विक्रमी दर; वाचा प्रतिक्विंटल कसा मिळतोय दर?
