Join us

यंदा केशर आंब्यालाही हवामानाचा फटका; बाजारात येण्यासाठी अजून किती दिवस लागणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 15:23 IST

Kesar Mango वातावरणातील बदल, थंडीचे कमी प्रमाण, जानेवारी-फेब्रुवारीत वाहिलेली कोरडी हवा या बाबींमुळे आंब्याला तीन टप्प्यांत मोहर आल्याने पिकणाऱ्या आंब्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता दिसते आहे.

शैलेश काटेइंदापूर: वातावरणातील बदल, थंडीचे कमी प्रमाण, जानेवारी-फेब्रुवारीत वाहिलेली कोरडी हवा या बाबींमुळे आंब्याला तीन टप्प्यांत मोहर आल्याने, पिकणाऱ्या आंब्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता दिसते आहे.

त्यामुळे तालुक्यात सर्वाधिक पिकणारा केशर आंबा स्थानिक बाजारात येण्यासाठी आणखी २० ते २५ दिवसांची वाट पहावी लागणार असल्याचे चित्र आहे.

आंबा तयार होण्याच्या या वाटचालीत, अवेळी पाऊस व वाऱ्याच्या संकटाबरोबर, तुडतुड्याचा प्रादुर्भाव, पिठ्या ढेकूण, खवले कीड ही विघ्ने येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या संकटांशी सामना करुन बाजारपेठेपर्यंत येणाऱ्या आंब्याची आवक कमी असणार आहे. त्यामुळे त्याचे दर चढेच रहाण्याची शक्यता आहे. आंबा हे वर्षातून एकदाच येणारे फळ आहे. ते वातावरणातील बदलाला वेगाने बळी पडते.

साधारणपणे जून, जुलैमध्ये आंब्याचा हंगाम संपल्यानंतर हलकीशी छाटणी घेऊन, फांद्या फुटू लागल्यावर पाच वर्षे वयाच्या पुढच्या आंब्याच्या झाडाला शेतकरी पॅक्लोबुट्राझोल या संजीवकाची आळवणी देतात. त्यामुळे नोव्हेंबर ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आंब्याच्या बागा मोहरल्या जातात.

चालू वर्षी ही कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार आंब्यांच्या बागांचे खत व्यवस्थापन ही व्यवस्थित झाले होते. सरासरीएवढा पाऊस ही झाला होता.

परंतू वातावरणातील बदल, कमी प्रमाणात पडलेली थंडी यामुळे आंब्यांना एकाच वेळी मोहर न येता जवळ जवळ तीन टप्प्यांमध्ये मोहर आला.

डिसेंबर, जानेवारीमध्ये सुरुवातीच्या मोहराला फळांचा चांगल्या लाग मिळाला. तथापि जानेवारी फेब्रुवारीमध्ये फुलोऱ्याच्या बागांना मोठ्या प्रमाणात फळ गळतीचा सामना करावा लागला.

त्याच कालावधीत वाहिलेल्या कोरड्या हवेने आंब्याच्या मोहरावर प्रतिकूल परिणाम झाला. याचा परिणाम आंब्याच्या उत्पादनावर होणार आहे.

इंदापूर तालुक्यात सुमारे २५० हेक्टर क्षेत्रात आंब्याची लागवड होते. बावडा, भाटनिमगाव, बेडशिंगे, अवसरी, बिजवडी, कालठण, व्याहळी, निमगाव केतकी, कळस या भागात आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते.

बहुतेक भागात केशर जातीच्या आंब्याच्या लागवडीस प्राधान्य दिले जाते. उत्पादित करण्यात आलेला ९० टक्के आंबा स्थानिक बाजारात विकला जातो.चांगल्या प्रतीचा १० टक्के आंबा निर्यात केला जातो. त्यास मागणी ही भरपूर असते.

आंबा लागवडीस अनुदान- गेल्या पाच वर्षात कृषि विभागाच्या अनुदानातून जवळपास १५० हेक्टर लागवड कृषि विभागाच्या अनुदानातून झाली आहे.- महाराष्ट्र शासनाच्या फळबाग लागवडीसाठी २०१८-१९ पासून सुरु झालेल्या, लहान व सीमांत शेतकऱ्यांसह अनुसूचित जाती, जमाती, महिलांना प्राधान्य देणाऱ्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेद्वारे फळबागांना तीन वर्षांसाठी अनुदान दिले जाते.- आंब्याच्या लागवडीसाठी पहिल्या वर्षी प्रतिहेक्टर २६ हजार ७८१ रुपये, दुसऱ्या वर्षी १६ हजार ६८ रुपये, तिसऱ्या वर्षी १० हजार ७१२ रुपये असे अनुदानाचे स्वरुप आहे.- महाराष्ट्र कृषी विभागाकडे ऑनलाइन पध्दतीने अर्ज करता येतात.- म.गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ही फळबाग लागवडीसाठी मंजुरी मिळू शकते.- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रति थेंब अधिक पीक अंतर्गत ठिबक सिंचनसाठी उपलब्ध असणारे अनुदान फळबागांसाठी उपयुक्त ठरू शकते.

यशस्वी आंबा उत्पादनासाठी एकात्मिक रोग, कीड व अन्नव्यवस्थापन योग्य वेळी फांद्याची विरळणी करणे आवश्यक आहे. वातावरणातील बदलांना सामोरे जाण्यासाठी आंब्याच्या बागेभोवती ऊन वारा रोधक वनस्पतीचे कुंपण असणे गरजेचे आहे. - राजेंद्र वाघमोडे, संचालक, म.फुले कृषी विज्ञान केंद्र, इंदापूर

अधिक वाचा: निंबोळी अर्कासाठी कशी कराल निंबोळ्याची वाळवण व साठवणूक; वाचा सविस्तर

टॅग्स :आंबाकीड व रोग नियंत्रणहवामान अंदाजतापमानपाऊसइंदापूरबाजारमार्केट यार्डशेतीशेतकरीफळेफलोत्पादनपीक व्यवस्थापन