पुणे : शेतकरी आत्महत्या प्रतिबंधासाठी राज्यस्तरीय टास्क फोर्स कोणताही नवीन अभ्यास किंवा सर्वेक्षण करणार नसून, प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देणार आहे.
विविध समित्यांनी केलेल्या अभ्यासाचा उपयोग करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर एक ठोस उत्पन्नाचा पर्याय देण्यासाठी टास्क फोर्समधील सर्व सदस्यांनी तत्कालीन, मध्यम व दीर्घकालीन अशा स्वरूपात प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले आहेत.
कृषी आयुक्तालयामार्फतशेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सची पहिली बैठक नुकतीच झाली. त्यात हा टास्क फोर्स कोणताही नवीन अभ्यास किंवा सर्वेक्षण करणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय पहिल्या बैठकीमध्ये घेतला आहे.
याऐवजी आतापर्यंत केंद्र व राज्य स्तरावर झालेल्या विविध समित्यांचे अहवाल, तज्ज्ञांचे निष्कर्ष, धोरणात्मक शिफारसी आणि उपलब्ध आकडेवारी यांचा आधार घेऊन थेट प्रत्यक्ष अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करणार आहे.
टास्क फोर्सचे अध्यक्ष रफीक नाईकवाडी यांनी राज्यात यापूर्वी शेतकरी समस्यांवर झालेले अनेक अभ्यास, आयोग व समित्यांनी सादर केलेले सखोल अहवाल याबाबत एकत्रित सादरीकरण केले.
यामध्ये श्रीजीत मिश्रा यांचे सूक्ष्म पातळीवरील सर्वेक्षण, बी. बी. मोहंती यांचे समाजशास्त्रीय विश्लेषण, नरेंद्र जाधव समितीचे धोरणात्मक मूल्यमापन व कृतिप्रधान आराखडा व एनसीआरबीचा अहवाल यांवर सखोल चर्चा करण्यात आली. समितीमधील इतर सदस्यांनी यावर आपले मत व्यक्त करून सहमती दर्शविली.
कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी यावेळी विविध समित्यांनी केलेल्या अभ्यासाचा उपयोग करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर एक ठोस उत्पन्नाचा पर्याय देण्यासाठी टास्क फोर्समधील सर्व सदस्यांनी तत्कालीन, मध्यम व दीर्घकालीन अशा स्वरूपात प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.
कर्जवाटप सुधारणा, सिंचन व जलव्यवस्थापन, दर व बाजारपेठ व्यवस्था, आणि पूरक व्यवसाय यांसारख्या उपाययोजना विचारात घेऊन आणि सर्व शिफारसींचे एकत्रित संकलन करून टास्क फोर्स 'अभ्यासाऐवजी कृती' या तत्त्वावर काम करणार आहे.
अधिक वाचा: जमिनीला आलाय सोन्याचा भाव; शेतजमिनी विकण्याकडे शेतकऱ्यांचा का वाढतोय कल? वाचा सविस्तर
