थंडी आता हळूहळू ओसरत असून फेब्रुवारीत बुलढाणा जिल्ह्यात तसेच राज्याच्या हवामानात लक्षणीय बदल जाणवण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या अंदाजानुसार या महिन्यात तापमानाचा आलेख सातत्याने चढता राहणार असून हवामान प्रामुख्याने कोरडे राहील.
त्यामुळे हिवाळ्याचा निरोप घेऊन उन्हाळ्याची चाहूल लागल्याचे चित्र असून याचा थेट परिणाम शेती, जलसाठे आणि मानवी आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात बुलढाणा जिल्ह्यात कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
मात्र, महिन्याच्या उत्तरार्धात तापमानाचा पारा आणखी वाढून ३५ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. किमान तापमानही १६ ते २० अंश सेल्सिअसपर्यंत राहणार असल्याने थंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, तर दुपारच्या वेळेत उष्णतेचा त्रास अधिक जाणवू शकतो.
जलव्यवस्थापन करावे!
फेब्रुवारी महिन्यात पावसाची शक्यता अत्यल्प असल्याचे हवामान तज्ज्ञ सांगतात. बहुतांश दिवस स्वच्छ आकाश, कमी आर्द्रता आणि कोरडे वातावरण राहणार असल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम थेट रब्बी पिकांवर होणार असून सध्या अंतिम वाढीच्या टप्प्यात असलेल्या हरभरा, गहू, ज्वारीसह इतर पिकांना आवश्यक असलेल्या ओलाव्याची कमतरता भासू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना जलव्यवस्थापन करावे लागणार आहे.
उन्हात सिंचन टाळावे !
कृषी तज्ज्ञांच्या मते, या काळात सिंचनाचे योग्य नियोजन करणे अत्यावश्यक आहे. ठिबक व तुषार सिंचनासारख्या कमी पाण्यात अधिक परिणामकारक पद्धतींचा वापर करावा, तसेच दुपारच्या तीव्र उन्हात सिंचन टाळावे, असा सल्ला देण्यात येत आहे. पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर केल्यास रब्बी पिकांचे नुकसान टाळता येऊ शकते. फेब्रुवारीत हवामानातील बदल अधिक स्पष्ट होईल.
हेही वाचा : कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारी परदेशी भाजीपाला शेती; जाणून घ्या सविस्तर
