गेल्या दोन महिन्यांत राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे तब्बल २६ लाख ७८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
त्यात ऑगस्टमधील नुकसान १४ लाख ४४ हजार हेक्टर, तर २३ सप्टेंबरपर्यंत १२ लाख ३४ हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे.
केवळ सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत ९४ तालुक्यांना फटका बसला आहे. तर एकूण १९५ तालुक्यांमधील शेतीपिके उद्ध्वस्त झाली आहेत.
राज्यात धाराशिव जिल्ह्यातील सव्वातीन लाखांहून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची मेहनत आणि कष्ट मातीमोल झाली आहेत. अनेक ठिकाणी जमीनही वाहून गेल्याने शेतकरी रस्त्यावर आला आहे.
कृषी विभागाकडून शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याने सध्या केवळ प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पंचनामे झाल्यानंतर बाधित क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यातील ३० जिल्ह्यांमधील शेती बाधित झाली आहे. राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून वेगवेगळ्या टप्प्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.
ऑगस्टमध्ये १४ लाख ४४ हजार ६४१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. तर सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत १२ लाख ३४ हजार २१० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांत पुरामळे पिके वाहून गेली आहेत.
सोयाबीनसारख्या पिकांची काढणी काही दिवसांत झाली असती मात्र, या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. अन्य पिकांचीही हीच स्थिती आहे.
सप्टेंबरमध्ये सर्वाधिक १ लाख ८१ हजार २०० हेक्टरचे नुकसान धाराशिव जिल्ह्यात झाले आहे. तर दोन महिन्यांत मिळून आतापर्यंतचे सर्वाधिक नुकसान ३ लाख ३१ हजार ९५३ हेक्टर धाराशिव जिल्ह्यातच झाले आहे.
बाधित पिके
सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग, भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद.
सर्वाधिक नुकसान झालेले पाच जिल्हे
नांदेड, बीड, सोलापूर, यवतमाळ आणि वाशिम.
जिल्हा - क्षेत्र (हेक्टर)
बुलढाणा - ५८७५४
अमरावती - २६७३
वाशिम - ३८५४१
यवतमाळ - १३७५६८
नागपूर - १०१६
चंद्रपूर - १४८६
वर्धा - २२९६०
सोलापूर - १७८३८६
अहिल्यानगर - १६८७७५
पुणे - २७३
जळगाव - १४७१८
परभणी - ५६८३६
जालना - ९३८१८
बीड - २६७८१८
धाराशिव - १८१२००
लातूर - ३२०३
एकूण - १२३४२०१
अधिक वाचा: अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसान भरपाईचा जीआर आला; कोणत्या जिल्ह्याला किती निधी?