पलूस : द्राक्षे उत्पादनात कायम आघाडीवर असलेल्या पलूस तालुक्याने पुन्हा एकदा नव्या यशाची नोंद केली आहे.
आमणापूर येथील बोरजाईनगरच्या माळी कुटुंबाने तालुक्यात प्रथमच 'आरा फायर क्रंच' (एआरडी ३५) या नवीन जागतिक दर्जाच्या द्राक्ष वाणाचा यशस्वी प्रयोग करून शेतीत इतिहास घडवला आहे.
सध्या या आमणापूरच्या माळी कुटुंबाच्या बागेच्या मालाचा पहिलाच तोडा करून तो परदेशात रवाना केला जात आहे. या बागेला परदेशातील लोक भेट देऊन माहिती घेत आहेत.
आमणापूर येथील श्रीकांत माळी आणि दामोदर माळी यांची द्राक्ष शेतीतील परंपरा दीर्घकाळापासून चालू आहे. त्यांनी १९८२ साली पलूस तालुक्यात पहिली द्राक्ष बाग लावून यशस्वी उत्पादनाचा उच्चांक याच कुटुंबाने प्राप्त केला आहे.
या कुटुंबांची ५० एकर क्षेत्रावर द्राक्ष बाग विस्तारली आहे. या शेतीचे व्यवस्थापन कुटुंबातील स्वतः पाच मुले आधुनिक पद्धतीचा वापर करून करत आहेत.
यांनी नवा वाण घेतला आहे तो 'आरा फायर क्रंच' या नावाने प्रसिद्ध असून ही द्राक्षे गडद लाल रंगाची आहेत. वाण रंग व कुरकुरीत चव यामुळे याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे.
कॅलिफोर्नियात विकसित झालेल्या या वाणाची मागणी परदेशात आहे. भारतात हा वाण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे.
विलास शिंदे व सुरेश ऐकुंडे यांच्या तांत्रिक मार्गदर्शनामुळे हा अवघड मानला जाणारा प्रयोग अमणापुरमध्ये यशस्वी ठरल्याचे शिंदे कुटुंबीयांनी सांगितले.
द्राक्ष शेतीला नवी दिशा मिळण्यास मदत होणार
◼️ हवामानातील बदल, रोगराई आणि बाजारातील चढ-उतार यावर मात करत या कुटुंबाने दर्जेदार उत्पादन घेतले आहे.
◼️ बदलत्या बाजारपेठेच्या गरजा ओळखून नव्या जातींची निवड, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतल्यास शेती अधिक फायदेशीर ठरू शकते, याचा आदर्श माळी कुटुंबाने उभा केला आहे.
◼️ या यशस्वी प्रयोगामुळे पलूस तालुक्यातील द्राक्ष शेतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
अधिक वाचा: थकीत उसाची बिले शेतकऱ्यांना व्याजासह मिळणार; कारखान्यांकडून आता १० कोटी रुपयांची बँक गॅरंटी
