धामोरी : ज्या कांद्याने कधीकाळी गृहिणींच्या डोळ्यांत पाणी आणले होते, आज तोच कांदा बळीराजाच्या डोळ्यात अश्रू आणत आहे.
कोपरगाव तालुक्यातील धामोरी, मायगावदेवी परिसरात सध्या उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम सुरू आहे. मात्र, कष्टाने पिकविलेल्या या कांद्याला बाजारात भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
शेतकऱ्यांच्या मते, एक एकर कांदा पिकविण्यासाठी साधारण ६० ते ७० हजार रुपये खर्च येतो. यात बियाणे, खते, मजुरी आणि मशागतीचा समावेश आहे.
अधिक वाचा: पीकविमा योजनेतून पहिल्या टप्प्यातील नुकसान भरपाई जाहीर; 'या' शेतकऱ्यांना मिळणार लाभ
मात्र, सध्या बाजारात केवळ १००० ते ११०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. या दरात साधी मजुरी आणि वाहतुकीचा खर्च निघणेही कठीण झाले आहे.
त्यामुळे पदरचे पैसे खर्च करून पिकविलेला कांदा विकायचा कसा, असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत. सुरुवातीला पावसाने बियाणे खराब केले, पुन्हा दुबार बियाणे टाकून रोपे तयार करावी लागली.
निसर्गाच्या लहरीपणावर मात करून पीक हाती आले, तर आता 'बाजार भावाच्या' संकटाने घेरले आहे. कांदा काढणीसाठी मजुरांना प्रति एकर ११ ते १२ हजार रुपये द्यावे लागत आहेत.
मजुरीचे दर वाढले असले तरी कांद्याचे भाव मात्र कोसळले आहेत. बाजारात भाव नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी आपला माल विकण्याऐवजी तो चाळीत साठवण्यावर भर दिला आहे.
भविष्यात कधीतरी चांगले भाव मिळतील, या आशेवर शेतकरी पुन्हा एकदा नशिबाचा जुगार खेळत आहे. धामोरी, मायगाव देवी, मोर्विस, सांगवी भुसार, मंजूर, कारवाडी, हंडेवाडी, चासनळी यासह अनेक गावांतील शेतकरी संकटात आहेत.
बियाणे टाकले तर पावसाने झोडपले, दुबार बियाणासाठी पुन्हा खर्च केला. आता कांदा निघाला तर त्याला भाव नाही. नुकसानभरपाई तर मिळत नाहीच, पण कष्टाचे फळही मिळेनासे झाले आहे. - समाधान साबळे, शेतकरी, मायगाव देवी
अधिक वाचा: दहा किलोवॅटपेक्षा अधिक सौर वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना झटका; लागू होणार आता 'हे' चार्जेस
