उत्तर भारतासह देशातील अनेक भागांमध्ये वाऱ्यातील गारठा कायम आहे. या गारठ्चामुळे थेट आरोग्यावर परिणाम झाला आहे. आजाराचे प्रमाण वाढले आहे. फेब्रुवारी मध्यानंतर वाशिम जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
यावर्षी थंडीचा प्रकोप सतत कायम राहिला. यात सातत्याने चढ-उतार होत राहिले. याचा परिणाम थेट मानवी आरोग्यावर झाला आहे. यामुळे सर्दी, खोकला, ताप या आजाराचे रुग्ण वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढले. थंडीचा जोर कमी होत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या १५ तारखेच्या नंतर तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला जात आहे.
थंडीसोबतच आता उन्हाचा कडाकाही नागरिकांना अनुभवावा लागणार आहे. वाशिम जिल्ह्याचे तापमान ४० डिग्री सेल्सिअसपेक्षाही अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. उन्हाची ही तीव्रता अनेक ठिकाणी पाणीटंचाईला कारणीभूत ठरणार आहे. यामुळे आतापासूनच नागरिकांना त्यादृष्टीने उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
अधिक पाऊस, अधिक थंडी, आता अधिक ऊन!
जिल्ह्यात यावर्षी अधिक पाऊस बरसला. याशिवाय थंडीचा प्रकोप अधिक दिवसापर्यंत पाहायला मिळाला. यासोबतच उन्हाची तीव्रता अधिक राहणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना थंडीप्रमाणेच अधिक उन्हाच्या तीव्रतेचा सामना पुढील काळात करावा लागण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारीनंतर तापमान झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे उष्माघात, निर्जलीकरण यासारख्या तक्रारी वाढू शकतात. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. ताप, अंगदुखी किंवा श्वसनाचा त्रास जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.- डॉ. विजय काळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम.
