रत्नागिरी: बदलत्या हवामानामुळे यावर्षी आंबा उत्पादन जेमतेम १५ ते २० टक्के इतकेच आहे. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसाला ३६ ते ४० हजार आंबा पेट्या कोकणातून जात आहे.
मात्र, स्थानिक बाजारपेठेत पुरेसा आंबा येण्याची प्रतीक्षा असतानाच कॅनिंग सुरू झाल्याने यावर्षी हापूसची चव चाखायला मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
उष्मा वाढल्यामुळे आंबा लवकर तयार होऊ लागला आहे. नाशवंत माल असल्यामुळे बागायतदार तयार आंबा काढून कच्चा, पिक्का विक्रीला पाठवित आहेत.
मात्र, यावर्षी उत्पादन कमी असल्यामुळे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील आवक निम्म्यापेक्षा कमी आहे, दर गतवर्षीपेक्षा तुलनेने जास्त आहेत.
गतवर्षी या हंगामात ८० हजार ते ९० हजार पेटी विक्रीला पाठविण्यात येत होती आणि दर १५०० ते २५०० रुपये इतकेच होते. यावर्षी आखाती प्रदेशातील युद्धामुळे आंब्याच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली आहे.
बागायतदारांचा पहिल्या टप्प्यातील आंबा संपला असून, दुसऱ्या टप्प्यातील आंबा सुरू झाला आहे. चार, पाच, सहा डझनच्या पेट्या भरल्यानंतर उर्वरित आंबा बागायतदार कॅनिंगसाठी देणे सुलभ झाले आहे.
डाग असलेला आंबा बाजारात चालत नाही. त्यामुळे तो कॅनिंगसाठी देणे परवडत असल्यामुळे बागायतदारांच्या पॅकिंग, वाहतूक खर्चात बचत होत आहे.
एकीकडे सुटा आंबा विक्री परवडत असली तरी आंबा विक्रीतून रोखीने पैसे मिळत असल्याने बागायतदारांची डोकेदुखी वाढली आहे. ५८ रुपये किलो दराने आंबा विक्री सुरू आहे.
सध्या बाजारात सुरू असलेली आंब्याची आवक दि. ५ मेपर्यंत कायम राहणार आहे. मात्र, दि. १० ते २० मेपर्यंत ही आवक अल्प राहील. पुन्हा मागचा किरकोळ आंबा दि. ३० मेपर्यंत असणार आहे. परंतु, त्याचे प्रमाण अत्यल्प असणार आहे. एकूणच आंबा कमी असताना सुरू झालेल्या कॅनिंग खरेदीमुळे बागांच्या संरक्षणाची जबाबदारी वाढली आहे. - राजन कदम, बागायतदार
अधिक वाचा: पीकविमा योजनेतून पहिल्या टप्प्यातील नुकसान भरपाई जाहीर; 'या' शेतकऱ्यांना मिळणार लाभ
