Heatstroke Prevention Tips : उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून तापमानाने ४२ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. (Heatstroke Prevention Tips)
या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभाग आणि प्रशासनाने नागरिकांना विशेष सतर्कतेचे आवाहन केले असून, दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे असा सल्ला दिला आहे.(Heatstroke Prevention Tips)
तापमान सतत ४०°C पार
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमान सातत्याने ४० अंशांच्या पुढे आहे. उष्णतेच्या लाटेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत असून चक्कर येणे, मळमळणे, अशक्तपणा जाणवणे असे त्रास वाढले आहेत. दुपारच्या वेळी शहरातील रस्ते ओस पडल्याचे चित्र दिसत आहे.
जिल्हा रुग्णालयात विशेष कक्ष
उष्माघाताच्या संभाव्य धोक्याचा विचार करून बीड जिल्हा रुग्णालयात १५ खाटांचा स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला आहे.
याशिवाय तालुकास्तरीय ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही प्रत्येकी २ खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
सध्या तरी एकही रुग्ण दाखल झालेला नाही, मात्र नागरिकांनी खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. - डॉ. नागेश चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक
उष्माघाताची लक्षणे ओळखा
अंगाचा ताप अचानक वाढणे
त्वचा कोरडी पडणे
तीव्र डोकेदुखी
मळमळ, उलट्या अशी लक्षणे दिसल्यास रुग्णाला तातडीने सावलीत ठेवून थंड पाण्याने शरीर पुसावे आणि जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करावे.
विशेष काळजी घ्या
लहान मुले, वृद्ध नागरिक आणि गर्भवती महिलांनी कडक उन्हात बाहेर जाणे पूर्णपणे टाळावे, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
खबरदारीचे उपाय काय?
पाण्याचे सेवन :
तहान नसली तरीही वारंवार पाणी प्या. बाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत ठेवा.
थंड पेयांचा वापर :
लिंबू सरबत, ताक, लस्सी, नारळ पाणी, ओआरएस यांसारखी पेये प्या, ज्यामुळे शरीरातील क्षार टिकून राहतात.
योग्य पोशाख वापरा
पांढऱ्या किंवा फिकट रंगाचे सुती कपडे वापरा. डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री वापरणे आवश्यक.
आहार
हलका व पचायला सोपा आहार घ्या. शिळे किंवा उघड्यावरचे अन्न टाळा.
तापमानाचा ट्रेंड
गेल्या आठवडाभरात बीड जिल्ह्यातील तापमान ३८ ते ४२ अंशांदरम्यान राहिले असून, पुढील काही दिवसही उष्णतेचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका गंभीर बनत आहे. योग्य काळजी घेतल्यास हा धोका टाळता येऊ शकतो. नागरिकांनी आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
अधिक वाचा : Heatwave Alert : उष्णतेचा कहर वाढतोय; अन् सरकार म्हणते उष्णतेची लाट 'आपत्ती' नाही?
