राजेश भोस्तेकर
अलिबाग: रायगड जिल्ह्यात भात उत्पादनामध्ये मोठी घट होत आहे. काही काळापूर्वी जिल्हा भात उत्पादनात अग्रेसर असल्याने त्याची ओळख भाताचे कोठार अशी होती.
मात्र शहरीकरण, औद्योगिकीकरण, महामार्ग विकास यामुळे शेतजमीन मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत. २०१८-१९ पासून जिल्ह्यातील भात लागवड क्षेत्र १ लाख २४ हजार हेक्टरवरून ८३ हजार हेक्टरवर आले आहे.
यंदाचे प्रति हेक्टर उत्पन्न २०८१.३२ किलोग्रॅम झाले असून, त्यात ७४६ किलोग्रॅमची घट झाली आहे. सिंचन विभागातही मर्यादा असून, केवळ ७१६५ हेक्टर क्षेत्र सिंचित आहे.
राजधानीच्या विकासात जमिनीची किंमत वाढली असून, जमीन विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने उत्पादन कमी होत आहे. जिल्ह्यात महाड, रोहा, पाताळगंगा, रसायनी, खोपोली, खालापूर, माणगाव, अलिबाग, तळोजा येथे औद्योगिक क्षेत्र आले आहे.
जिल्ह्यात मुंबई-गोवा, मुंबई पुणे महामार्ग, माणगाव-दिल्ली कॉरिडॉर, निजामपूर-दिधी, माणगाव-दिघी हे महामार्ग झाले आहेत. यामध्ये हजारो हेक्टर जमीन संपादित झाली आहे.
शेतजमिनी विकण्याकडे शेतकऱ्यांचा वाढला कल
◼️ जिल्हा शहरीकरणाकडे वळत असताना शेतजमिनी नष्ट होऊ लागल्या आहेत. शेती व्यवसाय करणे आता जिकरीचे झाले आहे.
◼️ शेतात टाकलेला पैसाही निघत नाही. त्यातच नैसर्गिक आपत्ती, अवेळी पाऊस यामुळे शेतीचे नुकसान होत आहे.
◼️ जिल्ह्यात जमीन खरेदी करण्याकडे बाहेरील व्यक्तींचा कल अधिक वाढला आहे.
◼️ त्यामुळे जमिनीला सोन्याहून अधिक दर मिळू लागला आहे. नवी पिढीही शेती व्यवसायाकडे वळत नाही.
◼️ त्यामुळे जमीन विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चालला आहे.
क्षेत्र कमी होण्याला पाण्याचा अभाव कारणीभूत
◼️ जिल्ह्यात शेतजमिनीपैकी केवळ ७ हजार १६५ हेक्टर सिंचन क्षेत्र आहे.
◼️ यातील २ हजार २८८ हेक्टर क्षेत्र हे विहिरींच्या पाण्यावर सिंचित केले जाते.
◼️ तर ४ हजार १७७ हेक्टर क्षेत्र हे इतर धरणे, कालवे आणि इतर साधनांनी सिंचित केले जाते.
◼️ त्यामुळे बहुतांश शेती ही खरिपाच्या लागवडीवर अवलंबून आहे. सिंचन सुविधांचा अभाव त्याला कारणीभूत ठरत आहे.
८३,००० हेक्टरवर भात लागवड
◼️ ८३,००० हेक्टरवर भात लागवड यंदा करण्यात आली होती. यातून २०८१.३२ प्रति हेक्टर किलोग्रॅम उत्पन्न मिळाले आहे.
◼️ गतवर्षीपेक्षा यंदा ७४६ प्रति हेक्टर किग्रॅ उत्पन्न घटले आहे.
◼️ जिल्ह्यात १ लाख २४ हजार हेक्टर लागवडीखालील शेती क्षेत्र २०१८-१९ पर्यंत १ लाख ११ हजार हेक्टरपर्यंत खाली आले.
प्रकल्पांसाठी भूसंपादन प्रक्रिया जोरात
◼️ रेवस-रेड्डी हा महामार्ग प्रस्तावित आहे. तसेच अलिबाग-विरार कॉरिडॉरसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे.
◼️ यामध्ये अजून शेतजमीन संपादित केली जाणार आहे. त्यामुळे भात लागवड क्षेत्र अजून कमी होणार आहे.
◼️ त्यात नवीन प्रस्तावित प्रकल्प येत असल्याने त्यासाठीही शेतजमीन संपादित केली जाणार आहे.
◼️ पूर्वी हजारो हेक्टर जमीन प्रकल्पासाठी घेऊन त्यात प्रकल्प न उभारल्याने ती पडीक झाली आहे.
◼️ त्यामुळे भात लागवड क्षेत्रात दिवसेंदिवस घट होऊ लागली आहे.
अधिक वाचा: कर्नाटकच्या बोनस तूर खरेदीचा परिणाम; गतवर्षीच्या तुलनेत यंदा तुरीच्या दरात मोठी उसळी
