भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. मात्र आजचा शेतकरी आत्महत्या करतो आहे... कारण शेती तोट्यात गेली आहे. निसर्गाची अनिश्चितता, वाढलेला उत्पादन खर्च, बाजारातील अस्थिरता आणि सरकारकडून वेळोवेळी होणारी दुर्लक्षताही यामागची प्रमुख कारणं आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या कोलमडून गेला आहे.
पण दुसरीकडे, याच शेतकरी कुटुंबांतील मुले दरवर्षी मोठ्या संख्येने बॅचलर ऑफ सायन्स इन अॅग्रिकल्चर (B.Sc. Agriculture) या व समतुल्य कृषी शिक्षण शाखेत प्रवेश घेतात. या शिक्षणाचा मूळ उद्देश आहे शेतकऱ्यांची प्रगती, शेतीतील आधुनिकतेचा विकास आणि कृषी क्षेत्राला सुगीचे दिवस आणणे. परंतु शिक्षण पूर्ण झाल्यावर जे वास्तव समोर येते ते अधिकच कटू आहे.
शेतीत भविष्य नाही, शेतकऱ्याला समाजात प्रतिष्ठा नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 'शेती करणाऱ्या मुलांना लग्नासाठी कोणी मुली देत नाही'! या भीतीमुळे कृषी शिक्षण घेतलेले हे तरुण शेतीकडे पाठ फिरवून मोठमोठ्या खत, कीटकनाशक आणि बियाणे उत्पादक कंपन्यांमध्ये तुटपुंज्या पगाराच्या नोकऱ्या स्वीकारतात.
तिथं त्यांचं काम काय असतं? तर तेच रसायनं, तेच पीजीआर, तेच कीटकनाशकं जी त्यांच्या वडिलांनी वर्षानुवर्षं वापरली तीच उत्पादने आता हीच मुलं नवनवीन ब्रँडच्या नावाखाली शेतकऱ्यांना विकतात… किंबहुना खपवतात!
ज्या रसायनांची मूळ किंमत अवघी १००-२०० रुपये इतकी असते, तीच उत्पादने ८००-१००० रुपयांमध्ये शेतकऱ्यांना विकली जातात. शेतकरी बापाला ज्या गोष्टींनी होरपळलं त्याच जखमांवर मीठ-मिरची चोळून ही शिक्षित मुलं नव्या मार्केटिंग भाषेत पुन्हा त्याच शेतकऱ्यांवर लादत आहेत.
शेतकरी कष्टकरी बापाची ही केवळ आर्थिक नव्हे तर नैतिक फसवणूकही सुरू आहे. शिक्षण घेतलेल्या तरुणांकडून शेतीत नाविन्य आणण्याची अपेक्षा होती पण त्यांनीच बाजारव्यवस्थेचा भाग बनून शेतकऱ्यांना अधिक अडचणीत टाकणं हे दुर्दैवी आहे.
कृषी संस्कृतीवर घाला घालणारी ही प्रक्रिया सध्या जोरात सुरू असून ज्या मातीतून आपण उगम पावलो एकप्रकारे त्याच मातीत विष ओतण्याचं काम हीच मुलं करत आहेत. या परिस्थितीत दोष कुणाचा? त्या मुलांचा? की या व्यवस्थेचा ज्याने शेतीला ‘तोट्याचा धंदा’ आणि शेतकऱ्याला ‘आपण व्यवस्थेचा कणा नसल्यासारखा’ व्यक्ती बनवलं?
समाजाने जेव्हा शेती करणाऱ्या तरुणांकडे आदराने न पाहता उपेक्षेने पाहिलं, तेव्हाच त्यांनी शेती टाकून दुसरा मार्ग पत्करला हेही येथे दुर्लक्षित करणे शक्य नाही कारण आता शेतकरी कुटुंबातील मुलीना सुद्धा शेतकरी बाप शेतकरी मुलगा 'नवरा' म्हणून स्वीकारायला तयार नाही हेही दुर्दैव.
या सगळ्यात “मुलं शिकून बापाची शेती वाचवायला नाही तर त्याचं शोषण करायला शिकतायत.” हे आधुनिक सत्य आहे. मात्र यात शेतकऱ्यांची आत्महत्या, शेतीला न मिळणारी प्रतिष्ठा, शेतमालाला योग्य बाजार आणि शेती करणाऱ्या तरुणांना समाजात स्थान दिलं गेलं पाहिजे. जे आज केवळ तुमच्या आमच्याच हातात आहे.